लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील निवासी अपंग शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेतील त्यांची यशाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. या शाळेचा निकाल सलग दहाव्या वर्षी १०० टक्के लागला आहे.
तालुक्यातील सास्तुर येथील निवासी अपंग शाळेच्या एकूण १५ पैकी १३ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर उर्वरित दोन विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून सलग दहा वर्षे १०० टक्के निकालाची किमया या विद्यालयाने केली आहे. या विद्यालयाच्या साक्षी नाईक व ऋतुजा साळुंके या दोन विद्यार्थिनींनी सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी शंभर गुण घेतले आहेत.
—————–
साक्षी नाईक, अभिषेक धानुरे व ऋतुजा साळुंके यांची यशोगाथा
कु. साक्षी लक्ष्मण नाईक ही जन्माने दिव्यांग असलेली विद्यार्थीनी. तिचा डावा हात पूर्णतः निकामी असल्यामुळे तिच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव होता. तिची आजी ही अक्षरशत्रू असली तरी आपल्या नातीने खूप शिकाव, मोठी अधिकारी व्हाव अस स्वप्न पाहील आणि तिला इयत्ता पहिली मध्ये सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत प्रवेश दिला. साक्षीची आई शेतमजूर. १० पर्यंत शिक्षण घेतलेल. आपल्याला लवकर लग्न केल्यामुळे शिकता आल नाही. पण पोरीन खूप शिकाव अशी तिचीही इच्छा… साक्षीचे वडील मात्र व्यसनाधीन असल्यामुळे सुरूवातीस आजी व आईला खूप संघर्ष करून साक्षीला शाळेत पाठवाव लागायच. साक्षी ही सुरूवातीपासून अत्यंत चुणचुणीत मुलगी. पॅरा स्पोर्टस मधील नावाजलेली ॲथलिट.. राज्यस्तरीय स्पर्धेत तिने आजतागायत ५ सुवर्णपदक व १ रजतपदक मिळवले आहे. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ९५.२० टक्के गुण मिळवून तिने प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तिला भारतीय प्रशासकीय सेवेतून जिल्हाधिकारी व्हायचंय व त्या माध्यमातून तिला आपलं अस्तित्व निर्माण करायचे आहे.
—–
अभिषेक शिवाजी धानुरे हा अत्यंत गरीब कुटुंबातील… कुटूंबाचा उदरनिर्वाह शेतमजूरीच्या माध्यमातून कसाबसा चालतो. अभिषेक हा जन्मतःच एका पायाने पूर्णतः अपंग. परंतू अतिशय हुशार. अभिषेकने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवले असून तो प्रशालेतून द्वितीय आला आहे. त्याला संगणक शिक्षणात रूची असून त्याला संगणक अभियंता व्हायची इच्छा आहे.
ॠतूजा बालाजी साळूंके ही मस्क्यूलार डिस्ट्राॅफी या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असून कमरेपासून खाली पूर्णतः अपंग आहे. बाल्यावस्थेत तीला चांगल्या प्रकारे चालता येत होते. परंतू हळू हळू तिच्या पायातील ताकत क्षीण होत गेली. सध्या ती व्हीलचेअरवर बसून असते. तिची मोठी बहीण पण तिच्यासारखीच आहे. ॠतूजाने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत दिव्यांगत्वावर मात करीत ८७.८० टक्के गुण मिळवले आहेत. ती प्रशालेतून तृतीय आली आहे. ऋतूजाला वाणिज्य शाखेतून पुढील शिक्षण घ्यायचे असून तिला बँक मॅनेजर व्हायची इच्छा आहे.