वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील नागराळ (लो) येथील धोकादायक पुलाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकांसह नागरीकांतुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोहारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नागराळ गावाजवळील गेली ४० वर्षांपूर्वी जुन्या केटी सिमेंट बंधाऱ्यावर अरुंद दगडी पुल बांधण्यात आला असून या पुलावरून वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या दोन्ही बाजूचे लोखंडी पाईप गायब झाले आहेत. त्यात गत वर्षी झालेल्या अतिवृष्टी व दमदार पावसाने या दगडी पुलांचा खालचा व बाजुचा काही भाग पाण्याच्या प्रवाहाने ढासाळला आहे. लोहारा ते नागराळ, उंडरगाव, कार्ला, खंडाळा मार्गे तुळजापूर जवळचा असल्यामुळे हा रस्ता रहदारीचा असुन या धोकादायक पुलावरुन प्रवास करताना तारेवरची कसरत करुन हा पुल पास करावा लागतो.
या बाबत नागराळ व उंडरगाव ग्रामपंचायतीने संबंधित विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व खासदार, आमदार यांना वेळोवेळी निवेदन, ठराव देऊन अनेक वेळा उपोषण केले पण निधीच्या नावाखाली या धोकादायक पुलाचे काम रखडले असून संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र पुलाची पाहाणी करुन हा दगडी पुल नादुरुस्त असल्याचा अहवाल वरिष्ठांना तसा सादर करताच पुलाच्या दोन्ही बाजूला धोकादायक पुल म्हणुन दिशादर्शक फलक नावालाच दोन वर्षांपूर्वी लावण्यात आले आहेत. तरी देखील लोहारा ते नागराळ रस्त्यावरील धोकादायक पुलाचे काम होत नसल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागराळच्या सरपंच रितु कुलदिप गोरे व उंडरगाव उपसरपंच महेश ढोबळे यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधी यांना इशारा दिला आहे.