आईचे २०२१ मध्ये कोविड १९ मुळे निधन झाले. आणि तिचा हक्काचं आधार गेला. अशा परिस्थितीत जिद्द व परिस्थितीची दोन हात करून ध्येय गाठायचेच असा दृढ निश्चय केलेल्या साक्षी सतीश पवार हिने १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेत ७८.३३ गुण घेऊन यश संपादन केले आहे.
साक्षी पवार हिचे मूळ गाव औसा तालुक्यातील बेलकुंड. तिचे तिसरी ते दहावीचे शिक्षण लातूर येथे झाले आहे. तिच्या वडिलांचा म्हणावा तेवढा आधार त्यांच्या कुटुंबाला नव्हता. त्यामुळे तिची आई प्राजक्ता पवार यांनी कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिवणकाम करत असे. शिवणकाम करून त्यांनी त्यांचा एक मुलगा व एक मुलगी या दोन अपत्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यातच तिच्या आईचे कोविड १९ मुळे २०२१ मध्ये निधन झाले. त्यामुळे तिच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. अशात पुढे काय करायचे हेच तिच्या लक्षात येईना. त्यात त्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिचे मामा शंकर जाधव यांनी तिला लोहारा येथे त्यांच्या घरी आणले. शंकर जाधव हे लोहारा शहरातील भारतमाता मंदिरात पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम करतात. त्यांनी तिची भाची साक्षीला त्यांच्या घरी लोहारा येथे घेऊन आले. त्यानंतर तिचे ११ वीचे शिक्षण लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात सुरू झाले. तिची पार्श्वभूमी व कुटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालयानेही तिच्या फिस मध्ये सूट दिली. तिचे पुढील शिक्षण सुरू झाले. हे महाविद्यालय शहराबाहेर जवळपास सव्वा ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. तिने दररोज हे अंतर पायी जात आपले शिक्षण पूर्ण केले. बारावीला गेल्यावर फिजिक्स विषयासाठी तिने आर्यभट्ट इन्स्टिट्यूट लोहारा या कलासेसमध्ये शिकवणी लावली. तिथेही इन्स्टिट्यूट चे चालक मनोज लोहार यांनी तिच्या परिस्थितीची जाणीव ठेवून व तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी फिसमध्ये सूट दिली.
या सर्व परिस्थितीचे भान साक्षीला होते. त्यामुळे तिनेही जिद्द व कष्टाच्या जोरावर तसेच आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुढे काही तरी करून दाखवायचे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून व आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे हा दृढ निश्चय करून अभ्यास केला. तिच्या या कष्टाचे अखेर चीज झाले असून तिला बारावी परीक्षेत ७८.३३ टक्के गुण मिळाले आहेत. साक्षीला पुढे संगणक क्षेत्रात करिअर करायच आहे. परंतु तिची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. अशा परिस्थितीत तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन तिच्या पुढील शिक्षणासाठी आधार देणे आवश्यक आहे.