वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी सध्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंद झालेल्या बस पूर्ववत सुरू करावी अशी मागणी होत आहे. लवकरात लवकर बस सुरू झाल्या नाहीत तर विद्यार्थी उपोषणाला बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मागील जवळपास दोन वर्षे कोविडच्या संकटांमुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले. परंतु कोविडचा धोका कमी झाल्याने यावर्षी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन शिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी सध्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या शाळेत वडगाव देव व बोरनदीवाडी या दोन गावातील जवळपास ३५ विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी तुळजापूर सास्तुर या बसने सकाळी ९.३० च्या सुमारास शाळेत येत होते. ही बस सायंकाळी ४.३० च्या सुमारास परत तुळजापूर ला जात होती. त्यामुळे या बसने हे विद्यार्थी शाळेतून परत गावाकडे जात होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी ही बस सोयीची होती. परंतु मागील काही दिवसांपासून तुळजापूर सास्तुर व तुळजापूर लोहारा या दोन्ही बस बंद झाल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
ही बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने शाळेला यावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. तसेच त्यांच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे त्यांना मोठी गैरसोय झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही बस अचानकपणे बंद का करण्यात येते असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने ही बस बंद झाली होती. ही बस बंद झाल्याने वडगाव देव व हिप्परगा येथील जे महाविद्यालयीन विद्यार्थी लोहारा व सलगरा येथील महाविद्यालयात जातात. त्यांनाही गैरसोय होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व सध्या होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय थांबविण्यासाठी तुळजापूर सास्तुर व तुळजापूर लोहारा या बस पूर्ववत सुरू होणे आवश्यक आहे.
तुळजापूर आगाराच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी दिली आहे. दोन वाजता जाणारी तुळजापूर लोहारा ही बस सलगरा दिवटी येथूनच परत जात असल्याने विद्यार्थ्यांना गावी पोहोचण्यास दररोज अडचण येत आहे. लोहारा जाणारी बस सलगरा दिवटी इथूनच परत का जात आहे याचे उत्तर आगार प्रमुख किंवा अन्य कोणीही देत नाही. तरी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सदर बस दररोज वेळेवर सोडावी अशी मागणी मुख्याध्यापक व पालकातून केली जात आहे. तात्काळ बस वेळेवर नाही सोडल्यास मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थी तुळजापूर आगारात उपोषणाला बसणार असल्याचे विद्यार्थी व मुख्याध्यापकांनी सांगितले आहे.