वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या शेती बिनभरवशाची झाल्याचे बहुतांश शेतकरी सांगतात. परंतु ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांचा संसार शेतीवरच अवलंबून आहे. परंतु शेती करताना येणाऱ्या अडचणीने त्रस्त झालेल्या लोहारा तालुक्यातील मार्डी येथील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून गांजा लागवडीस परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.
लोहारा तालुक्यातील मार्डी येथील युवा शेतकरी महेश वसंतराव कदम याने दि. १७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना विनंती अर्ज सादर करून गांजा लागवडीस परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. या अर्जात त्याने म्हणले आहे की, मी बिगरपाण्याची शेती करणारा शेतकरी असून निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी मला पाण्याची गरज आहे. म्हणून मी पोकरा योजनेत अर्ज दाखल केला. पण ते म्हणाले की, अगोदर स्वतः जवळील भांडवल / पैसे भरा आणि मग अनुदान मिळवा. म्हणून मी सोयाबीन पिकास चांगला दर आहे म्हणून त्याची निवड केली. सोयाबीन चांगलं पिकलं पण सोयाबीन चा दर १२ हजार रुपये क्विंटल वरून ५ ते ६ हजारावर घसरले. यामुळे आता माझ्याकडे भांडवल शिल्लक राहिले नाही. कारण काढणी, भरडणी, खुरपणी, मशागत आदीचा खर्च वजा जाता शेतकऱ्याला काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकरी फाशी घेतो किंवा सावकारी कर्ज काढून शेत करतो पण मी तसे करणार नाही. कारण मी एक युवा शेतकरी आहे.त्यामुळे सोयाबीनला प्रती क्विंटल दहा हजार रुपये भाव द्यावा किंवा गांजा / अफू लागवडीची परवानगी द्या अशी मागणी महेश कदम या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या विनंती अर्जात केली आहे. पुढे महेश कदम याने म्हणले आहे की, असे केल्याशिवाय शेती करणे परवडणार नाही. हा अर्ज वाचून योग्य तो न्याय करा नाहीतर न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल आणि शेतकरी फाशी घेईल नाहीतर गांजा लागवड करेल असेही या अर्जात नमूद केले आहे.