लोहारा तालुक्यातील होळी गावात अवैध दारूची विक्री खुप मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच गावातील अनेक तरुण व्यसनाधीनतेच्या जाळ्यात अडकले आहेत. आतापर्यंत जवळपास २७ तरुणांचा मृत्यू दारुच्या सेवनामुळे झाला आहे. त्यांचे कुटुंब सध्या रस्त्यावर आले आहे. घरचा कर्ता पुरुषच व्यसनाधिनतेमुळे मृत्युच्या दाढेत जात असल्यामुळे अनेक कुटुंबावर मोठं संकट उभारलं आहे. हे सर्व चित्र समोर ठेवून गावातील नवतरुण, सुशिक्षित नागरिकांनी पुढाकार घेण्याचे ठरवलं आहे. त्यानुसार होळी येथे सेंट्रल कृती समितीची स्थापना करण्यात आली.
सेंट्रल कृती समितीच्या माध्यमातून गावामध्ये विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणे तसेच गावांमध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे या बाबी सेंट्रल कृती समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून होळी गावात मारुती करंडे यांचं एकपात्री नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला गावातील लोकांनी खुप चांगला प्रतिसाद दिला. तसेच गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये महिला, पुरुष, मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या प्रभातफेरी मध्ये विविध सुविचाराचे फलक घेऊन तसेच व्यसनमुक्ती साठी नारे देत विध्यार्थी सुद्धा उपस्थित होते.
गावात प्रभात फेरी संपन्न झाल्यानंतर एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ग्रामसभेचे स्वरुप आले होते. बैठकीला ग्रामसेवक कारभारी तसेच सरपंच सरोजा बिराजदार उपस्थित होते. तसेच गावातीलच परंतु बाहेर गावी नौकरी, शिक्षणासाठी स्थलांतरित झालेले नागरिक सुद्धा या ग्राम सुरक्षा अभियानासाठी उपस्थिती होते. बैठकीमध्ये गावातील समस्या बाबतीत चर्चा झाली. व्यसनाधिनतेमुळे गावचे होणारे आतोनात नुकसान थांबवण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. गावासाठी काहितरी मनापासून तळमळ दाखवली पाहिजे. तरच ही गावची होणारी वाताहात थांबेल असे मत गावातील नागरिक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी आपल्या सोप्या शब्दात आपली तळमळ गावातील नागरिकांपुढे मांडली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद जाधव यांनी केले. विठ्ठल गायकवाड यांनी आपल्या परखड शब्दात व्यसनाधीनतेमुळे गावचे होणारे नुकसान तसेच वाया जात असलेली तरुण पिढी यावर भाष्य केले. तसेच करण बाबळसुरे यांनी आपण सर्व तरुणांनी संघटित होऊन काम करु. हे गावावर आलेलं संकट एकदिवशी नक्कीच दुर होईल असा विश्वास व्यक्त केला. गावातील नागरिक तसेच येवत या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी या पदावर कार्यरत असलेले बालाजी सरवदे यांनी गावच्या विकासासाठीच्या अनेक बाबी लोकांसमोर मांडल्या. तसेच याकामी तरुणांचा पुढाकार हा अत्यंत गरजेचा आहे असे मत त्यांनी मांडले.
तसेच ग्रामसेवक कारभारी यांनी गावाच्या हितासाठी जे काही करता येईल ते आपण सर्वजण मिळुन करुयात ग्रामपंचायत या कार्यात आपल्या सोबत आहे असं मत मांडले. सरपंच सरोजा बिराजदार यांनी महिलांनी संघटित झालं पाहिजे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे असे सांगितले. तसेच गावामध्ये १५० झाडं लावुन त्या झाडांचं पालनपोषण करुन गावाला एक वेगळा आदर्श देणारे गावातील वृक्षमित्र अशोक जाधव यांचा सत्कार कृषी समितीच्या माध्यमातून करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव सरवदे यांनी केले तर चंद्रहर्ष जाधव यांनी आभार मानले. यावेळी गावातील महिला, पुरुष, युवक उपस्थित होते.
————
२५ जणांची कृती समिती
गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी एकूण २५ जणांची कृती समिती तयार करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना पहिल्यांदा समज दिली आहे. यापुढेही जर अवैध धंदे सुरू राहीले तर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. तसेच याविषयी प्रबोधन होण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
———-
पोलिसांनी अधिक लक्ष देणे गरजेचे
या गावातील अवैध धंद्यांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन हे अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे हे अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनीही अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.