शासन आपल्या दारी उपक्रम सुरू केला. आता आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम सुरू करणार आहोत. आमची लढाई सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आहे, सत्तेसाठी नाही. महायुतीचे सरकार गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही ओरड केली तरी सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
लोहारा तालुक्यातील जेवळी येथे बुधवारी (दि.४) लोहारा व उमरगा तालुक्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, धाराशिव संपर्कप्रमुख राजन साळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी खासदार रवींद्र गायकवाड, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, बळीराम सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, नगराध्यक्षा वैशाली खराडे, प्रवक्ते योगेश केदार, सुरज साळुंके, अजित लाकाळ, आनंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेसाठी लोहारा व उमरगा तालुक्यातील महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टापर्यंत जाऊन प्रयत्न केले. परंतु मी मुख्यमंत्री होतो. आम्ही महायुतीच्या माध्यमातून ही योजना सुरूच ठेवली. या योजनेमुळे लाडक्या बहिणीना मोठा फायदा होतोय. अनेकांनी व्यवसाय सुरू केलाय. याचा मला समाधान आहे.
पुढील काही दिवसांत तूनमच्या खात्यामध्ये तीन महिन्यांचे साडे चार हजार रुपये जमा होणार आहेत. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजना कदापी बंद होणार नाही. कर्जमाफी संदर्भात एक बैठक झाली. कमिटी गठीत केली आहे. अहवाल आला की कर्जमाफी देणार आहोत. महायुतीच्या माध्यमातून विक्रमी निर्णय घेतले. सगळ्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, रोजगार संधी दिल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही योजना आणतोय. इथला तरुण नोकरीसाठी जिल्ह्याच्या बाहेर जाता कामा नये.

मोदींजींनीही अनेक निर्णय घेतले आहेत. ते देशाला पुढे नेत आहेत, आपण राज्याला पुढे नेऊया. महायुतीचे सरकार गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. उमरगा लोहारा तालुक्यात कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढेही असाच निधी उपलब्ध करून देणार आहे.
या निवडणुका ग्रामीण भागातील विकासाच्या निवडणुका आहेत. ही निवडणूक उद्याच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. विरोधक खोटी आश्वासने देतात. जे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनाच विजयी करा.
येत्या सात तारखेला धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. या सभेत पालकमंत्री प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड, प्रवक्ते योगेश केदार यांची भाषणे झाली. या सभेसाठी आकांक्षा चौगुले, अभिमान खराडे, बसवराज कारभारी, परवेज तांबोळी, अमोल पाटील, परमेश्वर साळुंके, शिवराज चिनगुंडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार स्वीकारणार नाही
या जाहीर प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना एका कार्यकर्त्याने हात वर करून बुके दाखविला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी अजितदादा यांचे निधन झाले आहे. त्यामुळे सत्कार स्वीकारणार नसल्याचे सांगितले.
नगरपरिषद निवडणुकीत माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार केला, भावांनी चमत्कार केला. मोठा विजय मिळवून दिला. ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे याही वेळी आमच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठया मताधिकक्याने विजयी करा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

एकेविसशे रुपये देण्याचा विचार सुरू
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देत आहोत. ही रक्कम वाढवून एकेविसशे रुपये करण्याचा विचार सुरू आहे.
लोहारा तालुक्यासाठी शिंदे यांचा शब्द
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, माकणी येथे निम्न तेरणा प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र उभारणी करणार तसेच लोहारा येथे एमआयडीसी करणार हा आमचा शब्द आहे.
माकणी जागेवरून वाद सुरूच
तालुक्यातील माकणी गटाच्या जागेवरून अद्याप वाद सुरूच आहे. याठिकाणी शिवसेना व भाजपा दोन्ही पक्षांनी अधिकृत उमेदवार दिले आहेत. दोन्ही तालुक्यात महायुती झाली असताना याच ठिकाणी हा वाद सुरू आहे. माकणीची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपाचा कुणीही उमेदवार असला तरी त्याठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार निवडून द्यावा असे आवाहन पालकमंत्री सरनाईक व माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी केले.








