लोहारा तालुक्यातील माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिक्षणरत्न शिवाजीराव मोरे आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकविला.
तालुक्यातील माकणी येथे शुक्रवारी (दि.३१) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन सत्रात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, संस्थेचे संस्थापक तात्यारावजी मोरे, श्रीधररावजी मोरे, शिवाजीराव मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे, संचालक रामराव इंगोले, विठ्ठलराव नरसाळे, अशोक पाटील, प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. व्ही. थोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दुसऱ्या सत्रात स्पर्धेचा निकाल घोषीत करुन मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी किशोर साठे, विठ्ठलराव नरसाळे, सुरेश मरगळे, सचिन सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यासह शेजारील लातूर व सोलापूर जिह्यातील महाविद्यालयातील एकूण १८ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी ‘स्मार्टफोन आणि सोशल मिडीयाचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक परिणाम होत आहे / नाही’ हा विषय ठेवण्यात आला होता. यात दमदार व सडेतोड मतमत्तांतर करत लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या संघाने ( संजीवनी गिलडा, सानिका बादुले) यांनी (रोख रक्कम १०००१/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) प्रथम क्रमांक पटकावला. लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाने ( आदिती ढगे व वैष्णवी पांचाळ) रोख रक्कम ७००१/- , स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) व्दितिय क्रमांक, तर मुरुम येथील कला, विज्ञान व वाणिज्य स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयाने (शुभांगी जाधव व शिफा पटेल) (रोख रक्कम ५०००/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) सांघिक उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला. तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून धाराशिव येथील तेरणा महाविद्यालय (गायत्री जांगीड व मनीषा जांगीड) यांनी प्रथम, माकणी येथील बीएसएस महाविद्यालय (सुप्रिया मुगळे व पृथ्वीराज रनखांब) द्वितीय तर उदगीर येथील शिवाजी महाविद्यालय (अंबिका ढोबळे व संचिता सावंत) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या बरोबर सर्व सहभागी संघ व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा. राजेंद्र निगडे (श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी), डॉ. सुभाष हुलपल्ले (माधवराव पाटील महाविद्यालय, मुरुम), डॉ. सन्मुख मुच्छटे (श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा) यांनी काम पाहिले.
प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी प्रास्ताविकात संस्थेचा परिचय करुन दिला. उपप्राचार्य डॉ. डी.व्ही.थोरे यांनी स्पर्धेच्या विषयाचे विवेचन व स्पर्धेचे नियम व अटी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरण लोमटे, प्रा. डॉ. रुपचंद खराडे व प्रा. डॉ. अनिल गाडेकर यांनी केले. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेसाठी बाहेरुन स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
