लोहारा तालुक्यातील जेवळी येथे जवळपास दिड कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठाचे वास्तु पूजन, लोकार्पण व श्री विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त एक आठवडाभर विविध कार्यक्रमांचे रेलचेल असून यावेळी दोन जगद्गुरुसह जवळपास पन्नास मठाधिपती, साधु- संत- महंत व हजारो भाविक – भक्तांची उपस्थिती राहणार आहे.
तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठाचे मठाधीश म्हणून तीन नोव्हेंबर २००६ ला मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांचा पट्टाधिका सोहळा पार पडला. मठाधीश संस्कृत व वैदिक अभ्यासात विशेष प्राविण्य संपादन केले असून धार्मिक शिक्षणाबरोबरच ज्योतिषी विद्या विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. दरम्यान भूकंपात जेवळी येथे मोठ्या प्रमाणात हानी झाले होती. यात बेन्नीतुरा नदीकाठी असलेल्या श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे ही नुकसान झाले होते. जेवळी गावच्या पुनर्वसनानंतर येथील परिसरातील भाविक भक्तांनी एकत्र येत जवळपास दीड कोटी रुपये लोक वाटा गोळा करून आधुनिक पद्धतीने मठाची निर्मिती केली आहे. सोमवारी दि. ७ एप्रिल रोजी रंभापुरी महापिठाचे जगद्गुरु डॉ. प्रसन्ना रेणुकावीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व काशी महापिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठाचे वास्तु पूजन, लोकार्पण व श्री विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण होणार आहे. दरम्यान

यासाठी येथे एक आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३१ मार्च ते ६ एप्रिल या काळात दररोज दुपारी तीन ते सायंकाळी पाच पर्यंत शिवकथाकार हरीहरानंद भारती स्वामीजी (धारुर) यांचा शिवकथा कार्यक्रम पार पडणार आहे. दि. ३ ते ५ एप्रिल या तीन दिवस सकाळी आठ वाजता अतिरुद्र याग, चंडिका होम व सर्व देवता आराधना, ५ एप्रिल ला आठ वाजता शिवलिंग दीक्षा व आय्याचार तर ७ एप्रिल सोमवारी अकरा वाजता मठाचे वास्तु पूजन, लोकार्पण व श्री विरभद्रेश्वर मंदिर कळसारोहण पार पडणार आहे. यावेळी परिसरातील पाच हजार सुवासिनींचे पुजन व ओटी भरण कार्यक्रम, यानंतर जगद्गुरु व ठीक ठिकाणाहून आलेले मठाधीश, साधुसंत, महंत यांच्या उपस्थितीत धर्मसभा पार पडणार आहे. यावेळी हजारो भाविक भक्त, शिष्य गण व नागरिक उपस्थितीत राहणार आहेत.







