दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे लक्ष लागले होते. अखेर शुक्रवारी (दि.२) दुपारी एक वाजता online निकाल जाहीर झाला आहे. दहावी परीक्षेचा लोहारा तालुक्याचा निकाल ९३.७८ टक्के लागला आहे.
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावेळी तालुक्यातील सालेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व सास्तुर येथील निवासी अपंग शाळा या दोन शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी तालुक्यातील एकूण १३०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी १२२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ५७३ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह, ४५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, १६७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये तर ३० विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूलने यावर्षीही यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेचा निकाल ८६.४० टक्के लागला असून श्रावणी संतोष सुर्यवंशी ही ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तर आरती दिपक खंडाळे ही ८९.८० टक्के गुण मिळवून द्वितीय आली आहे. तसेच गीता शिवाजी सुर्यवंशी ८६.८० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. या शाळेतील १६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणी मध्ये दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका यु. व्ही. पाटील आणि सर्व शिक्षकांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचा निकाल ९५.८३ टक्के लागला आहे. या शाळेतील १८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व दोन विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील एकूण ४९ विद्यार्थ्यांपैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेची विद्यार्थिनी अंकिता गणपतराव पाटील हिने ९५.२० टक्के गुण मिळवून प्रथम, सुजाता उमेश मुळे हिने ९४.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर गायत्री किसन मोरे या विद्यार्थिनीने ९४.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर सृष्टी रामदास जाधव हिने ९२.२० टक्के व सानिका नानासाहेब मोरे हिने ९१.४० टक्के गुण मिळवले आहेत.
लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा शाळेचा निकाल ९६.२२ टक्के लागला असून शाळेतील ६६ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह तर ६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेतील विद्यार्थिनी समिक्षा सोमवंशी हिने ९७.६० टक्के गुण मिळवून प्रथम, स्नेहा सुरवसे हिने ९६.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर समर्थ काशिनाथ जट्टे याने ९५.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.