वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील खेड, नागुर, भातागळी, कास्ती (बु) गावात रविवारी (दि.१५) वेळ अमावस्या सण साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबियांसह निमंत्रित मित्र, पाहुण्यांसोबत वनभोजनाचा आस्वाद घेतला.
हा सण शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अगदी सकाळ पासूनच शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांची कुटुंबासह घाई होती. शेतकऱ्यांनी शेतात एक खोप (कोप) तयार करून त्याच ठिकाणी धान्याची आणि मांडलेल्या पांडवांची पूजा करून एका अर्थाने वनराईची भक्तीभावाने पूजा केली. या पुजेसाठी नैवैद्य ही खास असतो. त्यामध्ये शेंगदाण्याचे लाडू, बोरे, जांभ, हरभऱ्याची ओली भाजी, ताक, लसूण व भाकरीच्या पीठापासून तयार केलेले अंबील, विविध भाज्या एकत्र करून तयार केलेली भज्जी आणि ज्वारी, गहू, बाजरीचे (सजगुर्याचे) उंडे याचा समावेश असतो. गोड पदार्थ म्हणून तिळगुळाची पोळी आणि गव्हाची खीर असते. त्याच प्रमाणे काही ठिकाणी पांढरी ज्वारी सडुन तयार केलेला आंबटभात ही असतो. आंबील वाटीत घेऊन शेतकरी भाऊ-भाऊ , पिता-पुत्र, आजा-नातू आदी पुऱूष पुजेभोवती प्रदिक्षणा घातल्या. यावेळी “इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे” असा घोष करण्यात आला. या पुजेचे वैशिष्ठ म्हणजे यात कुठलेच पौरोहीत्य नसतात. उघड्यावरच ज्योत पेटवली जाते. स्वत: बळीराजा ही पूजा करतो.
पूजा झाल्यानंतर आग्रहाने निमंत्रित केलेल्या मित्र, पाहून्यांच्या जेवणाच्या पंगती बसतात. वेळ अमावस्या निमित्त शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह मित्र परिवार यांच्यासोबत वनभोजनाचा आस्वाद घेतला. लोहारा तालुक्यातील खेड, नागुर, भातागळी, कास्ती (बु) सह तुळजापूर तालुक्यातील बारुळ, देवसिंगा (तुळ) व औसा तालुक्यातील आशिव येथे मकरसंक्रांती दिवशी वेळ अमावस्या सण साजरा करण्यात येतो.