लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विभागामार्फत गोगलगाय नियंत्रण उपाययोजना कार्यशाळा घेण्यात आली.
प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्री. तराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सास्तुरचे कृषी सहाय्यक दिपक जाधव यांनी मार्गदर्शन केले. मागील दोन-तीन वर्षापासून दीर्घकाळ पाऊस पडत असल्याने गोगलगायींना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गोगलगाय नियंत्रणाबाबत कृषी विभागामार्फत बैठका, पोस्टर्स, प्रात्यक्षिक जनजागृती तसेच रथाच्या स्वरूपातून व्यापक स्वरूपात प्रचार व प्रसिद्धी जनजागृतीचे काम सुरू आहे. कार्यशाळेमध्ये दिपक जाधव यांनी गोगलगाय नियंत्रण संदर्भात नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी शेतात जाऊन जमिनीत आलेल्या गोगलगायी गोळा करून प्लास्टिक पोत्यात गोळा करून त्यावर कोरडे मीठ अथवा चुना टाकून नष्ट कराव्यात. गोगलगाय शेतात जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी तंबाखूची भुकटी राखेचा अथवा चुन्याचा दहा सेंटिमीटर पट्टा टाकावा किंवा अंड्याच्या
टरफलाचा चुरा टाकावा तसेच सोयाबीनची पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन केले. यावेळी सास्तुरचे उपसरपंच मिथुन कार्ले, माजी उपसरपंच राजवर्धन पाटील, वीरेंद्र पवार, दादा माने, गोविंद यादव, प्रदीप कोकणे, बाबू सुतार, ज्ञानेश्वर कोळी, बाळू शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष फजल कादरी, बसवराज औसेकर, रमेश भुरे, आकाश कांबळे, विकास पांचाळ, आनंद हासुरे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.