ग्रामसेवक हा ग्रामीण जनता व प्रशासनातील महत्वाचा दुवा आहे असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषद मार्फत दिला जाणारा सन २०२१-२०२२ वर्षातील आदर्श ग्रामसेवकांचा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (दि. ३०) प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) सुर्यकांत भुजबळ यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा आधारस्तंभ आहे व तो ग्रामीण जनता व प्रशासन यातील महत्वाचा दुवा असून शासनाच्या बहुसंख्य योजना जनसामान्य पर्यंत पोहचवण्या मध्ये ग्रामसेवकांचे योगदान महत्वाचे असून अशा कार्यक्षम ग्रामसेवकांचा सन्मान होणे आवशयक आहे असे प्रतिपादन केले. तसेच ग्रामसेवक व सरपंचानी लोकशाहीच्या विकेंद्रीकरणातील ग्रामपंचायत स्तरावरील त्यांची जबाबदारी ओळखून काम पहावे अशी अपेक्षा व्यक्त केली व ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील असे आश्वस्थ केले.
या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील ८ पंचायत समिती मधून कार्यरत असलेल्या श्रीम. रेश्मा पवार पंचायत समिती उस्मानाबाद, गुरुनाथ बुलबुले पं.स.उमरगा, उमेश बारकुल प.स.कळंब, रुपाली माने पं.स.परंडा, ज्योती हारे पं.स.वाशी, मनोज चौगुले पं.स.तुळजापूर, सुशेन खंदारे पं.स.भूम, बापूराव जट्टे पं.स. लोहारा याप्रमाणे ग्रामसेवक यांचा आदर्श ग्रामसेवक म्हणून सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच सन २०१९-२०२० मधील राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विजयसिंह नलावडे, ग्राम विकास अधिकारी पंचायत समिती उस्मानाबाद यांचा ही सन्मान करण्यात आला. तसेच आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत विविध दाखले निर्गमित करण्यामध्ये जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरल्याबद्दल जिल्हा ग्रामसेवक संघटना व जिल्हा विस्तार अधिकारी संघटना यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) शाम गोडभरले, तसेच जिल्हा व्यवस्थापक आपले सरकार सेवा केंद्र अमर क्षीरसागर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ८ मार्च २०२३ रोजी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष कर वसुली मोहीमेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ७७ ग्रामपंचायती पैकी २४ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक, सरपंच, संबधीत विस्तार अधिकारी (पं) व गट विकास अधिकारी यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाम गोडभरले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एम. टी. जगताप व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे राज्य सल्लागार डी.ए.चव्हाण यांनी जिल्हा परिषद प्रशासन व ग्रामपंचायत विभागाचे आभार व्यक्त करून याप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामसेवक हे नेहमीच शासकीय योजना राबविताना जबाबदारीने व तन्मयतेने काम करत राहतील असे आश्वासन दिले. तसेच विस्तार अधिकारी (पं) व्ही. जे. वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामपंचायत विभागा अंतर्गत काम करणारी सर्व यंत्रणा उपक्रमशील असून शासकीय योजना राबवण्यासाठी सदैव तत्पर राहू असे आश्वस्थ केले.
कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी मार्गदर्शन, शासन व शब्बासकी या त्रिसूत्रीचे प्रशासनातील महत्व विषद करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यथोचित गौरव होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाम गोडभरले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष वंगवाडे, प्रमोद कांबळे, डोईफोडे, श्रीमती गरुड, श्री. पटेल, श्री. पंडागळे, श्री. हुंबे, श्री. रईस, श्री. हजारे, श्री. राऊत, श्री. विहीरे, श्री. सूर्यवंशी, श्री. चव्हाण यांनी परिश्रम घेतले. हृषीकेश कुलकर्णी यांनी आभार मानले.