महाराष्ट्र शासनाच्या लातूर विभागातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ प्राप्त झालेल्या करजखेडा येथील प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा करजखेडा चौरस्ता येथे सन्मानचिन्ह व आंब्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना जगदीश पाटील म्हणाले , “शेतीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता तरुणांनी अनिता चव्हाण यांना मिळालेल्या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करावी . त्यांच्या कर्तृत्वामुळे करजखेडा गावाचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर पोहोचले असून हा बहुमान केवळ त्यांचा नसून संपूर्ण गावाचा असल्याचे त्यांनी सांगितले. अनिता चव्हाण यांनी शेडनेटमध्ये ढोबळी मिरची व कारल्याची लागवड करून विक्रमी उत्पादन घेत आधुनिक शेतीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण शेतीपद्धतीमुळे त्यांना राज्य शासनाचा हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या कार्यक्रमास आबासाहेब चव्हाण, कृषी सहाय्यक व्यंकट सूर्यवंशी, खंडू शिंदे, लक्ष्मी म्हेत्रे, नंदकुमार क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, दयानंद पाटील, मधुकर कोळी, रवि आदटराव, अमोल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र फर्टिलायझर्स करजखेडा यांच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन तुकाराम आदटराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित चव्हाण, गोविंद गरड, विक्रम भोसले, मारुती दूधभाते, गणेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.








