लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील साठवण तलावात पवनचक्की कंपनीने उभे केलेले विद्युत पोल काढून टाकण्यात यावेत या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर सोमवारी (दि.२७) हे उपोषण सुरू झाले होते. तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि.२९) हे उपोषण मागे घेण्यात आले.
लोहारा तालुक्यात टोरंट व सिमेंस गमेसा या पवनचक्की कंपनीने तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे आपले पवनचक्कीचे प्रकल्प २०१९ मध्ये उभा केले असून या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी संपादित केल्या आहेत. जमिनी संपादित करत असताना ज्या ठिकाणी शेतकरी जमीन देण्यासाठी तयार होत नाही अशा ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने जमिनीचा ताबा घेऊन आपले विद्युत पोल रोवले आहेत. तसेच शासनाच्या साठवण तलावासाठी संपादित झालेल्या जमिनीवर व ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असतो अशा ठिकाणी उच्च दाब असलेले विद्युत लाईन उभा केले आहेत. वन्यजीव व शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभा केलेल्या विद्युत पोल काढून टाकण्यात यावे यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने लोहारा तहसील कार्यालयासमोर सोमवार (दि. २७) पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. जोपर्यंत साठवण तलावातील पोल काढून टाकले जात नाहीत व शेतकऱ्यांच्या शेतातील पोल बाबत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत सदरचे आमरण उपोषण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गोरे यांनी सांगितले होते. यावेळी उपोषणास बालाजी मुळे, महेश सुतार, शिवाजी लकडे, राजाभाऊ मुळे, दत्ता मुळे, अंकुश सुतार आदी उपस्थित होते.
याबाबत उपविभागीय पाटबंधारे विभाग देखील कुठलीच कार्यवाही करताना दिसत नाही गेल्या पाच वर्षापासून शेतकरी अर्ज देऊन देखील उपविभागीय पाटबंधारे विभाग शाखा क्रमांक आठ यांनी देखील कुठलीही कार्यवाही आजपर्यंत केली नसल्यामुळे १५ मे रोजी जलसमाधी आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने २४ मेपर्यंत पोल काढून टाकण्यासाठी वेळ मागून घेतला होता. मात्र त्यानंतरही कारवाई न झाल्यामुळे स्वराज्यच्या वतीने आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे उपोषण करण्यात येत होते. मंगळवारी (दि.२८) उपोषणाचा दुसरा दिवस होता. पहिल्या दिवशी व मंगळवारी दुपारपर्यंत कोणीही अधिकारी उपोषण स्थळी आला नसल्याचे स्वराज्यचे महेश गोरे यांनी सांगितले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि.२९) रात्री आठ वाजता पोलीस निरीक्षक अजित चिंतले, पाटबंधारे विभागाचे श्रीकांत कदम, पवनचक्की कंपनीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडण्यात आले. दि. ७ जून रोजी सर्व विभागाचे अधिकारी, पवनचक्की कंपनीचे अधिकारी, स्वराज्यचे प्रतिनिधी व शेतकरी यांच्या उपस्थितीत लोहारा पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सर्व विषयांवर चर्चा होऊन योग्य तो मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते सोडण्यात आल्याचे महेश गोरे यांनी सांगितले.