धाराशिव दि.30 (जिमाका) यावर्षी चांगला पाऊस (rain) अपेक्षित आहे. बँकांनी पीक कर्ज (crop loan) वाटपाची गती वाढवावी. जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण कमी आहे.जिल्ह्यातील कोणताही शेतकरी हा खरीप पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी.जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकांनी गावनिहाय शिबिराचे आयोजन करून शेतकऱ्यांकडून कागदपत्राची पूर्तता करावी.असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले.
30 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खरीप हंगाम – 2024 च्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेताना डॉ.ओंबासे बोलत होते.यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास, प्रभारी जिल्हा उपनिबंधक बालाजी काळे व बँकांचे जिल्हा समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओंबासे म्हणाले,सर्व बँक व्यवस्थापकांनी गावनिहाय पीक कर्जाबाबत शिबिराच्या आयोजनाची तारीख निश्चित करावी.पीक कर्जासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात त्याची पूर्तता शेतकऱ्यांकडून करून घ्यावी.त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.बँकांनी पीक कर्ज वाटपाचे जे उद्दिष्ट दिले आहे ते पूर्ण करावे.येत्या आठ ते दहा दिवसात गावनिहाय पिक कर्ज वाटपाचे शिबिरे आयोजित करावी.शिबिराच्या आयोजनाची पूर्वकल्पना बँकांनी त्यांच्या नोटीस बोर्डवर लावावी.तसेच बँकांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर शिबीराच्या आयोजनाची माहिती पाठवावी.म्हणजे त्यांच्या माध्यमातून गावनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिराची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे.त्यामुळे शेतकरी हे गाव पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी होऊन पिक कर्ज वाटपाचा लाभ घेऊ शकतील असे ते म्हणाले.
बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून पीक कर्ज वाटपाच्या दृष्टीने कारवाई करावी असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले, बँकांनी पीक कर्ज वाटपात प्रगती करून वेळेतच शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे.बँकांनी पीक कर्ज वाटपाचा दैनंदिन अहवाल जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांकडे सादर करावा. असे डॉ.ओंबासे यावेळी म्हणाले.
सन 2024- 25 या वर्षाच्या खरीप हंगामात बँकांना 1583 कोटी 77 लक्ष रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.जिल्ह्यातील 41 हजार 526 शेतकऱ्यांना 28 मे 2024 पर्यंत 313 कोटी 60 लक्ष रुपये खरीप पिक कर्ज वाटप केले असून पीक कर्ज वाटपाची टक्केवारी 19.80 इतकी असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक श्री.दास यांनी यावेळी दिली.
या बैठकीला जिल्हातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक आणि सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक ऑनलाईन पद्धतीने सहभागी होते.संबंधित बँकांचे जिल्हा व्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक यांनी त्यांच्या बँक आणि शाखांकडून आतापर्यंत या खरीप हंगामात केलेल्या पीक कर्ज वाटपाची माहिती यावेळी दिली.