वार्तादूत डिजिटल न्युज नेटवर्क
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील नवीन कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी (दि.३) वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण राज्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन वीरमाता मुख्याध्यापिकेच्या हस्ते करण्यात आले आहे.
१९९५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी शहीद झालेले कॅप्टन विनायक विष्णू गोरे यांच्या त्या मातोश्री आहेत. श्रीमती गोरे यांनी आपला मुलगा शहीद झाल्यानंतर राज्यातील शाळा-शाळांमध्ये जाऊन देशाच्या संरक्षणासाठी युवा पिढीने पुढे आले पाहिजे म्हणून व्याख्यानाद्वारे युवकांचे प्रबोधन केले. श्रीमती गोरे यांची तब्बल ८ पुस्तके आणि विविध वर्तमानपत्रात जनजागृती करणारे लेख प्रसिद्ध आहेत. माहे जानेवारी, २०१७ मध्ये बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. विशेष म्हणजे श्रीमती गोरे या पार्ले टिळक विद्यालयातून मुख्याध्यापिका पदावरुन सेवानिवृत्त झाल्या आहेत.
आपल्या कार्यालयाचे उद्घाटन वीरमातेच्या हस्ते व्हावे, अशी राज्यमंत्री बच्चू कडू यांची इच्छा होती आणि श्रीमती गोरे यांना उद्घाटनाचा सन्मान देऊन अत्यंत आदराने आज मंत्रालयातील त्यांच्या दालन क्र. २३१, दुसरा मजलाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल तसेच अनेक पदाधिकारी आणि मंत्रालयातील अधिकारी, सहकारी उपस्थित होते.