वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दीपावली पाडव्याचे औचित्य साधून २६ ऑक्टोबर रोजी किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पूर्व हंगामी कामांचा शुभारंभ कार्यक्रम व भाग खरेदी मेळावा होणार आहे. कारखाना मागच्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने दुरुस्तीची व ऑइलिंगची कामे करणं गरजेचं आहे. नुकतेच सरकारने किल्लारी कारखान्यासाठी शासकीय भागभांडवल उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कारखाना सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली दुरुती, ऑइलिंग व इतर पूर्व हंगामी कामांना वेळ न दडवता पाडव्यापासूनच सुरुवात करत आहोत.
शेतकऱ्यांना नवीन भाग खरेदी करता यावेत, सभासदांना अपूर्ण भाग पूर्ण करता यावेत व मयत सभासदांच्या वारसांना भाग हस्तांतरित करून घेता यावेत यासाठी त्याच वेळी भाग खरेदी मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. कारखाना बंद असल्याने मागच्या अनेक वर्षांपासून लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील गावांमधील हजारो शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. पण आता किल्लारी कारखाना कात टाकत असून नव्या जोशाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सेवेत लवकरच कार्यान्वित होईल अशी माहिती देण्यात आली आहे.