वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्ह्यातील ४५ वर्षाच्या पुढील सर्व नागरीकांना लसीकरण करण्यासाठी जलद व मोठ्या प्रमाणात लस पुरवठा करण्यात यावा अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री (आरोग्य विभाग) मा. ना. अश्विनीकुमार चौबे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उस्मानाबाद येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातही सद्यपरिस्थितीत बेड अपुरे पडत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक नियमानुसार सध्या ४५ वर्षे वयोगटातील सर्व नागरीकांना लसीकरण करण्यासाठी १० लक्ष एवढ्या लसीची आवश्यकता आहे. त्यामुळे लस साठा उपलब्ध करण्यासंदर्भात खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री (आरोग्य विभाग) मा. ना. अश्विनीकुमार चौबे यांच्याकडे मागणी केली आहे. एवढा लस साठा उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील ५ लक्ष २४ हजार इतक्या लोकांना लसीकरण करणे शक्य होणार आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे व सोशल डिस्टंसींगचे पालन करावे असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.