विद्यार्थ्यांमध्ये व समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवून विज्ञानाची आवड निर्माण करणे आणि अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लावणे हा विज्ञान मंडळाचा मुख्य उद्देश व कार्य असल्याचे डॉ. राधाकृष्ण तिगोटे यांनी सांगितले.
तालुक्यातील माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. राधाकृष्ण तिगोटे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनजंय माने हे होते. यावेळी लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य रामदास ढोकळे, माकणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे, नॅक समन्वयक डॉ. किरण लोमटे, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक डॉ. वैभव पतंगे, प्रसिद्धीप्रमुख डॉ. अतुल बिराजदार, विज्ञान समन्वयक डॉ. संजय बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञान मंडळ उद्घाटनाची सुरुवात दिपप्रज्वलनाने होवून प्रमुख मान्यवरांचे प्रथम स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सूर्यकांत कांबळे यांनी विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करून त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व लोकांमध्ये शास्त्रीय व तर्कशुद्ध विचारसरणी निर्माण करून अंधश्रद्धा निर्मूलन व चुकीच्या रूढी, परंपरा आणि समाजातील पसरणाऱ्या अंधश्रद्धांना फाटा देणे हाच मुख्य उद्देश असल्याचे मत आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

डॉ. रामदास ढोकळे यांनी सांगितले की, दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते निद्रा अवस्थेपर्यत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तू हे विज्ञानाचेच अविष्कार आहे. ते म्हणाले की, समाजामध्ये वावरत असताना विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करून लोकांमध्ये विज्ञानाचा प्रसार मराठी किंवा इतर मातृभाषेतून विज्ञानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, कुतूहल जागी करणे, निसर्गातील प्रत्येक घडामोडींमागील कारणे शोधण्याची आवड निर्माण करणे, प्रत्येक घडामोडीवर सुक्ष्म निरीक्षण करून त्यामागील कारणे शोधणे यालाच संशोधन असे म्हणले जाते असे ते म्हणाले.
डॉ. धनंजय माने यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार संशोधन प्रकल्प हा द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना लागू केला असून हा संशोधन प्रकल्प करणे बंधनकारक केले आहे. नवीन शोध व संशोधन होवून युवा वैज्ञानिक तयार होणे हाच यामागील खरा उद्देश आहे. तसेच विज्ञान प्रकल्प आणि प्रदर्शनांचे आयोजन करून त्यावर चर्चा व मार्गदर्शन तसेच वैज्ञानिक विषयांवर तज्ज्ञांची भाषणे आणि शिबिरे घेणे हे विज्ञान मंडळाचे ध्येय असून यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुप्रिया मुगळे हिने केले. तर कु. दत्ता बिराजदार या विद्यार्थ्यांने आभार मानले. डॉ. अनिल गाडेकर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.







