लोहारा शहरातील शिवप्रसाद भवन येथे कार्यरत ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शनिवारी (दि.४) सदिच्छा भेट देत केंद्रातील शांत, पवित्र व आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला.
यावेळी केंद्राच्या संचालिका सरिता दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती खासदार निंबाळकर यांनी जाणून घेतली. ब्रह्मकुमारीज संस्थेमार्फत ध्यानसाधना, राजयोग मेडिटेशन, आत्मशांती, सकारात्मक विचारसरणी तसेच संस्कारयुक्त जीवनपद्धतीचा संदेश समाजापर्यंत सातत्याने पोहोचविण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, “आजच्या धावपळीच्या व तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारांची अत्यंत गरज आहे. ब्रह्मकुमारीज संस्था समाजामध्ये नैतिक मूल्ये, बंधुभाव आणि आध्यात्मिक जागृती निर्माण करण्याचे अत्यंत मोलाचे कार्य करत आहे. युवक व महिलांना योग्य जीवनदृष्टी देऊन व्यसनमुक्त आणि सुसंस्कारित समाज घडविण्यात अशा केंद्रांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.”

तसेच “स्वतःमध्ये बदल घडवा आणि समाज परिवर्तन घडवा” हा संदेश देत संस्था मानवतेची व शांततेची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांना सकारात्मक जीवनदृष्टी देणे, व्यसनमुक्ती, नैतिकता व शांततामय सहजीवनाचा मार्ग दाखविण्याचे कार्य प्रत्यक्ष पाहून उपस्थितांना प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अशा आध्यात्मिक केंद्रांमुळे समाज अधिक सुसंस्कृत, संयमी व सशक्त बनण्यास निश्चितच मदत होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या भेटीदरम्यान खासदार निंबाळकर यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले. यावेळी बाळासाहेब पाटील, अमोल बिराजदार, सुधीर घोडके, पंडित बारगळ, शेखर पाटील, सचिन रसाळ, दीपक पोतदार, राजू स्वामी, राजेंद्र सूर्यवंशी, विजयकुमार बडडाळे, प्रेम लांडगे, मधुकर सुरवसे, राम माने, आकाश विरोधे, सुग्रीव माळी, दिलीप सुरवसे, अविनाश भाई, राणी बहिणजी आदी उपस्थित होते.








