मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीचे खूप मोठा इतिहास आहे. यात अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावली होती. या थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या इतिहासाकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. कारण लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे बहुद्देशीय इमारत बांधकामासाठी रू. २.५० कोटी व मुक्तीसंग्राम लढ्यात अमूल्य योगदान देणारे लातूर जिल्हातील औसा तालुक्यातील मातोळा येथील थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे मातोळा येथे स्मारक उभारण्यासाठी रू.१ कोटीचा निधी देण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर २०२३ रोजी संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. परंतु अद्याप काहीच झाले नसल्याने स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांमध्ये सरकारविरुद्ध रोष दिसून येत आहे. तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. आतातरी या घोषणांची अंमलबजावणी करून याठिकाणी तात्काळ निधी मंजूर करावा व काम सुरू करावे अशी मागणी होत आहे.
निजाम राजवटीत दुहेरी पारतंत्र्य होते. त्याकाळात मातृभाषेतून शिक्षण घेण्याची सुविधा नव्हती. १९२१ साली हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली. या शाळेने खऱ्या अर्थाने हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्याला ऊर्जा व कार्यकर्त्यांची फळी पुरविली. १९२३ ला स्वामी रामानंद तीर्थ या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. चार ते पाच वर्षात आडमार्गावर असलेल्या हिप्परग्यातील या शाळेकडे मुंबई प्रांत व हैद्राबाद संस्थानचे लक्ष वेधले गेले. या शाळेत ज्वलंत राष्ट्रभक्तीचे धडे व शारीरिक शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जायचे.

स्वामी रामानंद तीर्थ व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाचे व क्रांतीचे स्फुलिंग पेटविले. या शाळेतून देशासाठी कार्य करणारे अनेक लोक तयार झाले. क्रांतीकारकाच्या फळ्या तयार झाल्या. हिप्परगा येथील संस्था संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी होती. इंग्रजांच्या व निजामाच्या जुलमी अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्यास प्रवृत्त करणारी ही शाळा होती.
देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव यांचे प्राथमिक शिक्षण याच राष्ट्रीय शाळेत झाले होते. या गावात प्लेगची साथ आल्याने हि शाळा बंद करुन स्वामीजीनी अंबाजोगाई येथे योगेश्वरी विद्यालयाची स्थापना केली. येथे या राष्ट्रीय शाळेचे स्मारकही आहे. या ऐतिहासिक स्थळाकडे शासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. स्वातंत्र्य सैनिक व गावकऱ्यांनी मिळून या राष्ट्रीय शाळेची आठवण म्हणून स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्तंभ बांधलेला आहे. याकडेही शासनाने दुर्लक्ष केले आहे. याठिकाणी दरवर्षी १७ सप्टेंबरला विविध सामाजिक संघटना, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस येऊन अभिवादन करतात, कार्यक्रम घेतात. परंतु या दरम्यान पावसाळा असल्याने अनेक अडचणी येतात. याठिकाणी एक सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे यासाठी ग्रामस्थ, सामाजिक संघटनांनी अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. ग्रामपंचायतनेही ग्रामसभा घेऊन अनेकवेळा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केला गेल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. याठिकाणी सुसज्ज

सांस्कृतिक सभागृह, वस्तूसंग्रहालय उभारावे जेणेकरून मराठवाडा स्वातंत्र्यलढ्यातील व राष्ट्रीय शाळेच्या आठवणी या वस्तुसंग्रहालयामध्ये वास्तू व तैलचित्रांच्या माध्यमातून पुढील पिढीला या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास समजेल. तसेच विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका एकाच इमारतीत उभारण्यात यावी अशी मागणी होती. याचा विचार करून दोन वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हिप्परगा (रवा) या ठिकाणी बहुद्देशीय इमारत बांधकामासाठी रू. २.५० कोटी व मातोळा (ता. औसा) येथे क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांच्या स्मारकासाठी रु. १ कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले होते.
परंतु तीन वर्ष झाले तरी याठिकाणी कसलेही बांधकाम सुरू झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे घोषणा करण्यात आलेला निधी कधी मिळणार व बहुद्देशीय इमारतीचे बांधकाम कधी सुरू होणार, मातोळा येथील स्मारकाचे काम कशी सुरू होणार असे प्रश्न ग्रामस्थांकडून विचारले जात आहेत. या निधीची घोषणा झाल्यावर काही लोकप्रतिनिधीनी याचे श्रेय घेण्यासाठी खूप आटापिटा केला. परंतु आता ही मंडळी कुठेच पाठपुरावा करताना दिसत नसल्याचाही आरोप केला जात आहे.








