वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यात एक आगळा-वेगळा पुनर्विवाह पाहायला मिळाला. आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या लेकरांना या पुनर्विवाहाने मायेची सावली अन् वडीलांचे छत्र मिळाले तर एकमेकांना नवे जीवनसाथी. उमरगा तालुक्यातील मुळज येथील रविकांत विलास सोनकांबळे व दाबका येथील अयोध्या धनराज कांबळे या दोघांचा पुर्नविवाह शनिवारी (दि.१०) रोजी संपन्न झाला. रविकांत यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. त्यात त्यांना दोन मुली व एक मुलगा असे अपत्य झाले. सुखी चालत असलेल्या संसारात पत्नीला कर्करोग झाला व त्यात दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले. यामुळे लेकरावरील मायेचे छत्र हरवले. तर अयोध्या यांचा नवरा व्यसनाच्या आहारी जाऊन घरातून पळून गेला. एक लहान मुलगी आहे. नवरा पळून जाण्याने मुलीवरील बापाचे छत्र हरवले. विशेष म्हणजे रविकांत व अयोध्या यांच्या दोघांच्याही वडीलांचे निधन झाले आहे. त्यामुळे दोघांचेही भवितव्य अंधारात होते. रविकांत व अयोध्या यांच्या पुनर्विवाह करण्याच्या विचाराने हा योग जुळून आला. हा विवाह उमरगा शहरातील बहुजन हिताय वसतिगृह येथे बौद्ध पध्दतीने संपन्न झाला. धम्मचारी प्रज्ञाजित यांच्या हस्ते हा विवाह लावण्यात आला. हा प्रकाशरुपी परिणय घडवून आणण्यासाठी दाबका येथील प्रा. संजीव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद कांबळे, प्रा. उत्तम कांबळे यांनी समुपदेशन करुन व विचार पटवून प्रयत्न केले. या विवाहप्रसंगी अनेक अनिष्ठ रुढीपरंपराना मूठमाती देणारे आणि नवे रचनात्मक पायंडे पाडणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. किरण सगर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. सगर सरांनी अशा प्रकारच्या विवाहांची गरज असल्याचे सांगून नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनास शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे यानी मनोगत व्यक्त केले. महिला प्रमुख अश्विनी कांबळे, महिला संघटक रंजना सुरवसे, धम्मचारी ज्ञानस्वर, धम्मचारी आर्यघोष, धम्मचारी शाक्यदिप तसेच वधू-वरांच्या आई सोजराबाई-काशीबाई यांची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे कमी संख्येत, कोविड नियमानुसार अतिशय कमी खर्चात हा मंगल परिणय संपन्न झाला.