मुरूम प्रतिनिधी :
काळानुरुप प्राध्यापकांनी स्वतःमध्ये बदल करून शिक्षण क्षेत्रातील नवनवीन आव्हाने स्वीकारून ते आत्मसात करावीत. तंत्र कौशल्यावर आधारित व्यवसायाभिमुख शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. शिक्षकांनी महाविद्यालयातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार विषय निवडता येतील, मग तो कोणत्याही शाखेतील विषय घेऊन आपले शिक्षण पूर्ण करू शकेल. या धोरणात विद्यार्थ्यांना विशिष्ट विषय घेतले पाहिजेत असे बंधन राहणार नाही. त्यामुळे शिक्षकांनीही त्या दृष्टीने अध्ययन आणि अध्यापन केले पाहिजे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील अभ्यासक्रम, नियोजन हे विद्यार्थ्यांच्या हिताचेच राहणार असल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्री माधवराव पाटील महाविद्यालयात सोमवारी (ता.७) रोजी भेटीदरम्यान आयोजित कार्यक्रमात पुणे येथील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी केले.
पुढे बोलताना डॉ. माने म्हणाले की, संपूर्ण राज्यातील महाविद्यालयाचा विकास आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक धोरण महत्त्वाचे आहे. शिक्षक हा शिक्षक पदावर रुजू झाल्यापासून ते शेवटपर्यंत शिक्षकच असतो. शिक्षकाविषयी समाजात आदर असल्याचे शेवटी ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी केले. यावेळी डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. रवी आळंगे, डॉ. अरविंद बिराजदार, डॉ. सतिश शेळके, डॉ. अविनाश मुळे, डॉ. महेश मोटे, डॉ. मुकुंद धुळे, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. राम बजगिरे, डॉ. संध्या डांगे, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. शीला स्वामी, डॉ. सुजित मटकरी, डाँ. नरसिंग कदम आदिसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार यांनी मानले.