वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन मंगल कार्यालय, उपहार गृह आणि इतर गर्दीच्या ठिकाणी निर्बंध आणणे गरजेचे होते. त्याबरोबरच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने कर्फ्यूची वेळ वाढवणे आवश्यक होते. यामुळे व्यापाऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे, ही बाब खरी आहे. मात्र प्रशासनाचा प्रयत्न संपूर्ण लॉक डाऊन टाळणे हाच आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.
वारंवार सूचना देऊन कारवाई करूनही ५० टक्यांपेक्षा पेक्षा अधिक नागरिक विना मास्क फिरत आहेत. शनिवारी १६० हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नाईलाजाने निर्बंध कडक करावे लागत आहेत. परिस्थिती सुधारल्यास तातडीने कर्फ्युचा वेळ कमी करण्यात येईल.
सध्या प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात रुग्ण संख्या सर्वोच्च असताना जितके ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर, CCC बेड आवश्यक होते त्यापेक्षा अधिक बेड उपलब्ध करून दिले आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी आवश्यकतेनुसार खाजगी रुग्णालयातील बेड आरक्षित केले जातील. मात्र नॉन कोविड रुग्णांसाठी पुरेसे बेड असावेत याचाही प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले. आरटीपीसीआर चाचण्यांची जिल्ह्याची क्षमता ३५० प्रती दिन इतकी आहे. ती वाढवून एक हजार करण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे असे सांगून श्री. दिवेगावकर यांनी
Remedesivir, faviflu इतर औषधांच्या साठ्याचा आढावा घेऊन पुरेशी औषधं उपलब्ध राहतील याची दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती दिली. नागरिकांनी कोविड आजाराचे कोणतेही लक्षण अंगावर काढू नयेत. आपल्यामुळे घरातल्या वडीलधाऱ्या लोकांना संसर्ग होऊ नये याची दक्षता घ्यावी.
पहिल्या टप्प्यात ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्ती आणि सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण जिल्ह्यातील ३३ ठिकाणी सुरू केले आहे असे सांगून जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर म्हणाले, नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता लसीकरणाच्या मोहिमेला प्रतिसाद द्यावा. त्यातून Covid १९ साथीचा मृत्युदर कमी होण्यास मदत होईल.
सध्याच्या परिस्थितीत एकूण रुग्णांच्या ९० टक्के लोक लक्षणे नसलेले आहेत. परंतु १० टक्के रुग्णांना गंभीर लक्षणे दिसतात. त्यामुळे कोणीही अंगावर आजार काढू नये. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर गंभीर रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येतील. ही परिस्थिती उद्भवू नये यासाठीच नागरिकांनी गर्दी करू नये, मास्कचा वापरा करावा असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.