वार्तादूत डिजिटल न्युज नेटवर्क
सध्या महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी करणारी वक्तव्ये अनेक पुढारी करत आहेत. ज्याला महाराष्ट्राची ओळख नाही असा राज्यपाल आपल्याला भेट देण्यात आली आहे अशी जोरदार टीका डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी (दि. ८) केली आहे.
लोहारा तालुक्यातील होळी येथे उमरगा लोहारा तालुका मातंग समाज लहुशक्ती यांच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महाराष्ट्र मातंग समाज लहु शक्तीचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत शिंदे, अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीमाई साठे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोकराजे सरवदे, माजी जि.प. सदस्य दिपक जवळगे, ऍड. प्रभाकर लोंढे, शितल चव्हाण, राम चव्हाण, सतीश कसबे, सुखदेव होळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी व शोभायात्रेने करण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत घोड्यावरील युवक, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील युवती उपस्थितांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक सुखदेव होळीकर यांनी केले. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवराना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊचे प्रचंड मोठे योगदान आहे. महाराष्ट्रासाठी अनेक महापुरुषांनी मोठे योगदान दिले आहे. परंतु सध्या काय सुरू आहे. राजकारणातील अनेक पुढाऱ्यांकडून महापुरुषाबद्दल चुकीची वक्तव्ये करून त्यांची बदनामी केली जात आहे. महाराष्ट्र एक व्हावा, महाराष्ट्राने भारताचे नेतृत्व करावे अशी परंपरा आहे. परंतु सध्या वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची ओळख नाही, महापुरुषांबद्दल माहिती नाही असा राज्यपाल मोदींनी आपल्याला भेट दिला आहे अशी जोरदार टीका यावेळी डॉ. सबनीस यांनी केली.
या संमेलनात चार ठराव संमत करण्यात आले. महाराष्ट्रातील एक इंचही जमीन कर्नाटक सरकारला देणार नाही, महापुरुषांच्या होत असलेल्या अवमानाबद्दल जाहीर निषेध, मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अण्णाभाऊना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा हे चार ठराव स्वागताध्यक्ष अशोकराजे सरवदे यांनी मांडले. त्याला उपस्थितांनी पाठिंबा दिला. यावेळी होळीच्या सरपंच सरोजा बिराजदार, सुरेश वाले, बसवराज वरनाळे, प्रा. व्यंकटेश कसबे, रंजना हासुरे, लोकजागर सांस्कृतिक मंचाचे पवार सर यांच्यासह होळी व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संमेलनासाठी सरपंच सरोजा बिराजदार यांच्यासह युवराज कोकाटे, ओम बिराजदार, संजय बिराजदार, बालाजी मडोळे, लक्ष्मण राठोड, राम जाधव, दत्ता गायकवाड, बालाजी सरवदे, प्रताप होळीकर, बालाजी बनसोडे आदींनी परिश्रम घेतले. प्रा. जाधव यांनी सूत्रसंचालन केले.