सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे, लाभार्थीना लाभ मिळावा, विविध योजनांत पारदर्शकता आणणे, गतीमान प्रशासन या संकल्पनेतुन योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणे, सरकार लोकाभिमुख करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळत आहेत. राज्यातील शेती हा मुख्य व्यवसाय आहे. बळीराजा मुख्यमंत्री पाणंद मुक्त योजनेच्या माध्यमातून सर्व रस्ते मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. एक माॅडेल तालुका बनावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार बसवराज पाटील यांनी दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व राज्याचे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा आरोग्य विभाग, उमरगा व लोहारा तालुका महसूल विभाग व शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने उमरगा येथील आदर्श महाविद्यालयात बुधवारी (दि.२२) छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, संयोजक मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्त्यांचे सह अध्यक्ष शरण पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, सागर नन्नवरे, तहसीलदार गोविंद येरमे, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, शिरिष उटगे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कोमल गरड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, सभापती बसवराज कस्तुरे, विजयकुमार सोनवणे, जिप सदस्य रफिक तांबोळी, आप्पासाहेब पाटील, योगेश राठोड, बलभिम पाटील, प्राचार्य डॉ. राम सोलनकर, प्राचार्य श्रीराम पेठकर, प्रल्हाद काळे, गणेश अंबर, साई टाचले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, आमदार म्हणून काम करताना जागतिक बँकेचे कर्ज घेऊन उमरगा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणले. त्याचा कोरोना काळात मोठा फायदा झाला आहे. ते २०० खाटांचे करुन महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालयासाठी प्रयत्न करु. लोकहितासाठी सुरू केलेली आरोग्य व शेत रस्त्याची चळवळ सुवर्णयोग आहे. यामध्ये सातत्य रहावे, याला सर्वांनी साथ दिली पाहिजे. मराठवाड्यात सर्वात जास्त पाणंद रस्त्यांची कामे आपल्या तालुक्यात झाली असुन मजबुतीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध होईल. या भागातील रस्त्यास सर्व महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी शुध्द भावनेने, सर्वांना सोबत घेऊन उमरगा तालुक्याला मराठवाडयात नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी यावेळी दिले.
यावेळी शरण पाटील यांनी दोन लाख रुपये पर्यंतचे शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून त्यांच्या अभिनंदन केले. यावेळी ५ लाभार्थीना लाभ वितरणाचे आदेश वितरीत करण्यात आले. या शिबिरात लातुर, सोलापूर व धाराशिवसह उमरगा शहरातील विविध आजारांवरील तज्ञ व नामवंत डॉक्टरकडून कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र, कान, नाक, घसा आदीसह सर्वच रोगांवरील ९५८५ रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. महारक्तदान शिबीरात १०१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी ३५६ जणांची रक्त चाचणी करण्यात आली. यामध्ये ३५ लोकांना शुगर झाल्याचे आढळले. १० दिव्यांग तपासणी करण्यात आली तर १२० लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले. ५५ जणांचे छातीचे एक्सरे काढले यापैकी ७ जण टीबी संशयित आढळले. युडीआयडी १० जणांचे हॅंडीकॅप काढण्यात आले. उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी प्रास्ताविक तर तहसीलदार गोविंद येरमे यांनी आभार मानले.








