शासनाने २५ गडकोटांच्या संवर्धनाची जबाबदारी द्यावी असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. “जय भवानी, जय शिवाजी”, “तुमचं-आमचं नातं काय – जय जिजाऊ, जय शिवराय” या गगनभेदी घोषणांनी गड दुमदुमला होता. या सोहळ्यावेळी समितीचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “शिवराज्याभिषेक दिन” हा आपल्या दृष्टीने देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन आहे. शासनाने राज्यातील पंचवीस गडकोटांच्या संवर्धनाची जबाबदारी आम्हाला दिल्यास, शिवभक्तांच्या साथीने त्यांचे योग्य जतन, संरक्षण आणि संवर्धन कसे करावे, याचा आदर्श आम्ही घालून देऊ. रायगडाचा विकास हा माॅडेल म्हणून उभा राहत आहे.”
यंदाच्या सोहळ्यात विशेष आकर्षण ठरले –
मेघडंबरीतील शिवपुतळ्याचे पूजन
सुवर्णमुद्रांनी अभिषेक
नगारखाना, बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिर मार्गावरून निघालेली राजदिंडी पालखी मिरवणूक
सदरेवर रंगलेले शाहीरांचे पोवाडे आणि गाथा
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना ध्वज प्रदान करण्यात आला. संपूर्ण रायगड परिसरात शिवभक्तांची अलोट गर्दी दिसून आली. गडाच्या पायऱ्यांचे नूतनीकरणाचे काम, पाणी व्यवस्थापन, तसेच अन्य मूलभूत सुविधांची कामे समितीच्या पुढाकाराने सुरू आहेत.
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे क्षणचित्रे –









