वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तालुक्यातील ढोकी येथे असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे हजारो शेतकरी, कामगार व शेतमजूर यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे अनेकांवर आपल्या घराला कुलूप लावून स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. तसेच शेतकर्यासह परिसरातील नव्हे तर तीन तालुक्यातील अनेक कुटुंबांना आधारवड ठरलेला हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करावा या एकमेव मागणीसाठी तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने दि.२२ फेब्रुवारी रोजी कारखाना स्थळावर हजारोंच्या संख्येने पायी रॅली, बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढीत शेतकऱ्यांनी आपला आक्रोश सरकारसमोर मांडला आहे. या मोर्चा दरम्यान मोर्चेकऱ्यांनी तोंडाला मास्क बांधून कोरोनाच्या नियमांचे पालन केले.
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे मराठवाड्यातील सर्वात पहिला व सर्वात मोठा सहकारी तत्त्वावरील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या १३ वर्षापासून बंद असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना गाळपासाठी ऊस घालण्यास विविध अडचणी उद्भवत आहेत. उद्भवणार्या सर्व अडचणीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उसाचे पीक घेणे बंदच केले आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच निसर्गाची विविध संकटे येत असल्यामुळे इतर पिकांपासून उत्पन्न मिळत नाही. विशेष म्हणजे या कारखान्यावर शेतकर्यांसह कामगार, शेतमजूर व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिकांचे संसार सुरू होते. मात्र हा कारखाना बंद झाल्यामुळे सर्वावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे सरकारने या कारखान्यासाठी जाहीर केलेल्या थक हमी रकमेपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ३० कोटी रुपयांचा निधी विना विलंब वर्ग करावा व हा कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी राज्यातील इतर ५० कारखान्यांना सुरू करण्यासाठी दिलेल्या परवानगी प्रमाणे या कारखान्यास परवानगी द्यावी, कारखाना कर्मचार्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम सोलापूर येथील कार्यालयात जमा करावी यासह इतर मागण्यासाठी तेरणा बचाव संघर्ष समितीच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला.
ढोकी येथील हनुमान चौकातून निघालेला हा मोर्चा बस स्थानक, पेट्रोल पंप मार्गे कारखाना स्थळी धडकला. कारखाना स्थळी मोर्चा धडकल्यानंतर त्याचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी प्रास्ताविकामध्ये दत्ता देशमुख म्हणाले की, गेल्या ९ वर्षाच्या काळात तेरणा बंद असल्यामुळे या भागातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विकास थांबला असून सरकार मोठमोठ्या उद्योजकांना मदत करीत आहे. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी या कारखान्यास मदत केली नसल्यामुळे सरकारने तात्काळ पावले उचलून हा कारखाना सुरू करण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे. कारण कोरोनामुळे जेवढी माणसे मरत नसतील त्यापेक्षा जास्त माणसे हा कारखाना बंद असल्याने काम नसल्यामुळे उपाशीपोटी मरत आहेत. तर ॲड. अजित खोत म्हणाले की, १९६७ साली हा कारखाना सुरु करण्यासाठी शिवाजीराव नाडे, किसनराव समुद्रे, तत्कालीन खा. तुळशीराम पाटील यांच्यासह इतरांनी अथक प्रयत्न केले. तर या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळेच या भागाचे वैभव फुलले. मात्र हा कारखाना बंद झाल्यामुळे परत ते गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तर यावेळी सतीश देशमुख म्हणाले की, बंद पडलेला हा कारखाना सुरू करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळीची मदत घेण्यासाठी शिष्टमंडळासह त्यांना भेटून हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तसेच संग्राम देशमुख म्हणाले की, या कारखान्यावर ५० खेडेगावातील एक लाख लोकांचा प्रपंच अवलंबून असून हा कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येत हे आंदोलन उभे केले आहे. त्यामुळे हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून ते शेतकरी पुत्राचे आहे. तर माझा शेतकरी, कामगार, शेतमजूर यांचा स्वाभिमान उभा राहण्यासाठी व तेरणातून पहिल्यासारखा सोन्याचा धूर निघेपर्यंत हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित झाले असले तरी कोरोना काळ संपल्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बोलताना लक्ष्मण सरडे म्हणाले की, शेतकऱ्यांचा ऊस गाळप होत नसल्यामुळे या परिसरातील इतर कारखाने जो दर देईल त्याप्रमाणे शेतकऱ्यांना आपला ऊस गाळपासाठी नाईलाजाने पाठवावा लागत आहे. या आंदोलनात आम्ही कुठल्याही प्रकारचा पक्षीय मतभेद न करता आपल्या बरोबर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवाजीराव देशमुख म्हणाले की, येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये कारखान्यातून साखर बाहेर पडली पाहिजे यासाठी सर्वांनी हे आंदोलन सातत्याने सुरू ठेवण्याचे आवाहन केले. तर सतीश वाकुरे म्हणाले की, या आंदोलनात महिला रस्त्यावर उतरल्या म्हणजे सर्वांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत हे यावरून स्पष्ट होत आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब असून हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू झाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना अमोल समुद्रे म्हणाले की, सरकारने तेरणा कारखान्याला थकहमी दिली होती. त्यातील काही रक्कम जिल्हा बँकेला दिली तर हा कारखाना सुरू होऊ शकतो. तो कारखाना भाडेतत्त्वावर देऊन पुन्हा ऊर्जितावस्था आणावी व त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगितले. यावेळी सुशील गडकर यांनी हा कारखाना सुरू करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहू असे सांगितले. यावेळी बोलताना गफार काझी म्हणाले की, या कारखान्यामुळे ढोकी व परिसरातील सर्व गावांतील शेतकऱ्यांच्या उसाला चांगल्या प्रकारे दर मिळत असल्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत होते. मात्र कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. तर सुशील गडकर यांनी हा कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी अहोरात्र प्रयत्नशील रहणे गरजेचे असल्याचे सांगितले.
युवकांनी आंदोलनाची धुरा हाती घ्यावी
हा कारखाना सुरू करण्यासाठी जे आंदोलन हाती घेण्यात आलेले आहे. या आंदोलनात युवक मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाले आहे. तेरणा बचावपासून सुरु झालेले हे आंदोलन तेरणा चलाओपर्यंत सुरू ठेवायचे आहे. या आंदोलनात सातत्य ठेवण्यासाठी युवकांनी मोबाईलचा वापर कोणत्याही नेत्याची समाज माध्यमावर कुठल्याही कार्यक्रमाची पोस्ट पडली की त्या पोस्टवर तेरणा कारखान्याचे काय ? अशी पोस्ट टाकून ही मोहीम तीव्र करण्यासाठी सतत सर्वच राजकीय पक्षच नव्हे तर कुठल्याही कार्यक्रमात तेरणा कारखान्याचे काय ? ही मोहीम कारखाना सुरू होईपर्यंत चालवावी असे कळकळीचे आवाहन निहाल काझी यांनी यावेळी केले.
बाजारपेठा कडकडीत बंद !
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ढोकी गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे किराणा दुकान, खत विक्री दुकान, गॅरेज, हॉटेल्स यासह सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रथमच तेरणा कारखाना सुरू करणे किती गरजेचे आहे ? याची जाणीव व प्रचिती यावरून दिसून आली.
कारखाना उभा करण्यासाठी किसनराव समुद्रे, शिवाजीराव नाडे, तत्कालीन खा. तळशिराम पाटील, कलिमोद्दिन काझी, उतरेश्वर वाकुरे, भास्कर दिवाण, बाजी घुले, नानी औटी, किसन देशमुख यांच्यासह इतरांनी योगदान दिले आहे. त्यापैकी हयात असलेल्यांचे ऋण व हयात नसलेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
भाग्योदय महिला संघाच्यावतीने पाठिंबा
या आंदोलनात महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. आंदोलनस्थळी उमेद अंतर्गत सुरु असलेल्या भाग्योदय महिला संघाच्यावतीने अध्यक्षा सविता सुतार, सोनल शिंदे व प्रीती साळुंखे यांनी पाठिंब्याचे निवेदन आंदोलन कर्त्यांना दिल्यामुळे उपस्थितांनी देखील त्यांच्या निर्णयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले.