लोहारा तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे व ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (chief minister Eknath Shinde) यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हणले आहे की, लोहारा तालुक्यातील जवळपास सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीन व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत व मदत देण्यात यावी. लोहारा तालुक्यामध्ये सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावेत, सर्व बाजारसमितीमध्ये हमीभावाप्रमाणे सोयाबीनची खरेदी करण्यात यावी, कोणत्याही जाचक अटी न टाकता शासनाने एसडीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांना शेतासाठी दिवसा वेळेवर व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्यात यावी, अनेक शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान जाहीर झाले असून ते अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना ते अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
वरील सर्व मागण्या शासनाने तात्काळ पाठपुरावा करून सोडवाव्यात अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक दीपक जवळगे, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, प्रा. पांडुरंग पोळे, मेहबूब गवंडी, केशव सरवदे, बळीराम गोरे, कुलदीप बडुरे, श्रीकांत वडजे, बलभीम रसाळ, विलास साळुंके, राम मिटकरी, सचिन रसाळ, दत्तू रसाळ, सोमनाथ पाटील, प्रभाकर रसाळ, विश्वनाथ सुतार, बंसी जाधव, पंडित रसाळ, किसन रसाळ, सविता मडोळे, शालिनी चव्हाण यासह शिवसेना पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.