लोहारा तालुक्यातील माकणी येथील बी.एस.एस. वरीष्ठ महाविद्यालयात भाषा विभागाच्या वतीने कथासम्राट मुन्शी प्रेमचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते व उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ धनंजय माने हे होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. धनाजी थोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ. के.आर. सुरवसे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून वाङ्मय मंडळाची उद्दिष्टे विशद केली. हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. आर.एम. खराडे यांनी हिंदी भाषेचे महान लेखक प्रेमचंद यांच्या जयंतीच्या अनुषंगाने त्यांचे लेखन आणि चिंतनाची वैशिष्ट्ये व वर्तमान काळात त्यांच्या विचारांची प्रासंगिकता यावर आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटक व वक्ते डॉ. समाधान पसरकल्ले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साहित्यिक, सांस्कृतिक गुण संवर्धनाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाची संधी साधण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे आहे तद्नंतर युवकांचे जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. अशा वेगवेगळ्या महाविद्यालयीन उपक्रमाद्वारे विद्यार्थी सक्षम होतात असे प्रतिपादन केले.

प्राचार्य धनंजय माने यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात होणाऱ्या विविध स्पर्धांत भाग घेण्याची संधी मिळण्याचे एक उत्तम व्यासपीठ विद्यार्थ्यांना मिळते. अंतर्गत स्पर्धांखेरीज जिल्ह्यात होणाऱ्या विविध स्पर्धांना जसे की, वक्तृत्व, कथाकथन, अभिवाचन, निबंधलेखन, काव्यलेखन अशा विविध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून पाठविले जाते. त्याद्वारे त्यांच्या अनुभव विकासनाची उत्तम संधी प्राप्त होते आणि व्यक्तिमत्व विकासाची दारे खुली होतात. वाङ्मयीन अभिरुची बरोबरच व्यक्तिमत्व विकास हे उद्दिष्ट दृष्टीसमोर ठेवून वाङ्मय मंडळाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरण लोमटे यांनी तर अनिल चव्हाण यांनी आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख डॉ. अतुल बिराजदार, विद्यार्थी, वरिष्ठ प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








