वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मुंबईतील कुलाबा येथील हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागासह मराठवाडा आणि उस्मानाबाद जिल्हयात दि. ४ ते ८ ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी (सावधगीरी) बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
मराठवाडयातील उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ५ ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात तर ६ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वारे वाहून विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. ७ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, बीड, जालना जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर ८ ऑक्टोबर रोजीही उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सावधगीरी बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्याजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. या वाऱ्यामुळे पश्चिम किनाऱ्याजवळच कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात ८ ऑक्टोबर पर्यंत ही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.