नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येथे आयोजित पर्पल फेस्टमध्ये तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
या दिव्यांग विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी टाटा पॉवर्स कंपनीने मोलाचे योगदान दिले. निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध झाले होते आणि त्यांनी या संधीचे सोने केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, केंद्रिय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल आणि इतर अनेक उपस्थित मान्यवर या दिव्यांग विद्यार्थ्यांचे अलौकिक नृत्य कौशल्य पाहून भारावून गेले.

शाळेच्या कलापथकात सरस्वती पुजारी, अस्मिता वाघमारे, रौफ चौधरी, भाग्यश्री कांबळे, सूर्या शिंदे, गायत्री सूर्यवंशी आणि महादू सुरवसे यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका संध्या गुंजारे, निशांत सावंत, शंकरबाबा गिरी तसेच राजीव गांधी अपंग विद्यालयाचे अरुण बेंबडे यांचे मार्गदर्शन लाभले. टाटा पॉवर्सचे विश्वासराव सोनवळे यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली शाळेच्या कलापथकाने ही यशस्वी वाटचाल केली. शाळेच्या कलापथकाने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचे संस्था सचिव निर्मलाताई बदामे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, सच्चिदानंद बांगर, मुख्याध्यापक बालाजी नादरगे, प्राचार्य भरत बालवाड यांनी अभिनंदन केले आहे.
