शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.५) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील शेतकरी, महिला, तरुण, वृद्ध आणि सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
तहसीलदार रणजित कोळेकर यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांच्या आर्थिक कर्जमाफीचा प्रश्न, प्रोत्साहन अनुदान न मिळणे, ‘एक रुपयात पीक विमा’ योजनेतील फसवणूक, शेतमालासाठी परदेशातून होणारी आयात, शेतकरी सन्मान योजनेतील अडथळे, हमीभाव व शीतगृह योजनेतील अपयश तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा ढिसाळ व्यवहार याचा उल्लेख करण्यात आला आहे. महिला सुरक्षा आणि लाभ योजनांमध्ये होत असलेली उपेक्षा, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ न होणे, तरुणांना नोकऱ्या न मिळणे, बेरोजगारीचे वाढते प्रमाण आणि विविध योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसणारी दिरंगाई यामुळे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये निराशा पसरली आहे. या सर्व गंभीर समस्यांकडे राज्य शासन आणि प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना (उबाठा) लोहारा तालुक्याच्या वतीने सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, या समस्या लवकर न सुटल्यास रास्ता रोको आंदोलन, ठिय्या आंदोलन तसेच तहसील कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात येईल. शेतकरी, महिला, तरुण, वृद्ध आणि सर्वसामान्य जनता या आंदोलनामध्ये एकजुटीने सहभागी होणार आहेत. हा लढा फक्त एक आंदोलन नव्हे तर राज्यातील शेतकरी समाजाचा आवाज होणार आहे, जो कुणालाही दुर्लक्ष करता येणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना शिवसेना जिल्हा संघटक दिपक जवळगे, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील, माजी सभापती विलास भंडारे, शहरप्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक शामसुंदर नारायणकर, युवासेना शहरप्रमुख प्रेम लांडगे, महेबूब गवंडी, राजू स्वामी, रघुवीर घोडके, बळीराम गोरे, अनिकेत स्वामी, सोमनाथ भोंडवे, विजयानंद ओवाडे, राजकुमार सूर्यवंशी, ज्ञानेश्वर लोभे, दत्ता गिरी, चेतन गोरे, प्रशांत गिराम, किशोर सूर्यवंशी, धनराज जाधव, रविकांत भोंडवे, काकासाहेब सूर्यवंशी, तुकाराम वाकळे, हरिभाऊ गोरे यांच्यासह शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.