वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
अधिग्रहण केलेल्या विंधन विहिरीचा मागील तीन वर्षांपासून मावेजा मिळालेला नाही. त्यामुळे हा मावेजा लवकर मिळावा अशी मागणी जेवळी येथील शेतकरी बसवराज होणाजे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) येथील शेतकरी बसवराज होणाजे यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, गावाच्या जवळ माझी शेतजमीन आहे. १९९३ च्या भूकंपानंतर पुनर्वसन झाले. यानंतर नवीन जेवळी गाव तयार झाले. तेंव्हापासून आजपर्यंत प्रत्येक उन्हाळ्यात या गावात पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे मी पाच वर्षांपूर्वी पाण्याची सोय व्हावी म्हणून माझ्या शेतातून घरापर्यंत पाईपलाईन करून पाणी आणले आहे. ग्रामपंचायतने माझ्या घरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीलाच ही पाईपलाईन जोडली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून माझी विंधन विहीर अधिग्रहण केली जात आहे.
सन २०१९- २० मध्ये अधिग्रहण केलेला ५० टक्के मावेजा अद्याप मिळाला नाही. त्यानंतर प्रत्येक वर्षी आधी ग्रहण करण्यात येते. मात्र त्याचा मावेचा दिला जात नाही. यासंदर्भात ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करून चौकशी केली. मात्र बजेट नाही असे सांगण्यात येते. नेमके हे बजेट कुठून आणि कोण देणार हेच आम्हाला कळेनासे झाले आहे. आम्ही तक्रार तरी किती वेळा करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या सांगण्यावरून आम्ही शेतातील पिके वाळवून गावाला पाणी द्यायचे आणि त्याचा मोबदला / मावेजा मिळण्यासाठी वारंवार विनंती आणि अर्ज का करावा लागतो. यासाठी कोणीही जबाबदार नाही का असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.
माझ्या दोन्ही मुली शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. प्रत्येक महिन्याला त्यांना पैसे पाठवावे लागतात. शासनाने याप्रकारे जर तीन वर्षे पैसे दिले नाही तर शेतकऱ्यांच्या मुलींनी शिकावे कसे हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला मानसिक त्रास होत आहे. यासाठी नेमके जबाबदार कोण आहेत. यासंदर्भात उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील यांना सांगितले असता त्यांनी याची चौकशी केली. तेंव्हा समाधानासाठी तेरा हजार दोनशे रुपये मावेजा खात्यावर जमा करण्यात आला. शासनाकडून मोठ्या प्रमाणात मावेजा येणे शिल्लक असताना एवढी हेळसांड का करण्यात येत आहे हेच समजत नाही.
त्यामुळे पुढील एक महिन्याच्या आत संपूर्ण मावेजा जमा झाला नाही तर उपोषण किंवा आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. आमची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे मावेजा तात्काळ देण्यात यावा अशी मागणी शेतकरी बसवराज होणाजे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे या निवेदनाद्वारे केली आहे.
————–
🔴 शेतकऱ्यांच्या मुलांनी कसे शिकावे ?
शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतात कष्ट करतो. परंतु बहुतांश वेळा काहीना काही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात चालला आहे. त्यात मुला मुलींचे शिक्षणासाठी होणारा खर्च मोठा आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना शिक्षण कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.