साखरपुड्याच्या कार्यक्रमाला म्हणून दोन्हीकडील नातेवाईक आले खरे. पण जाताना मात्र नवदाम्पत्यांना वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वाद देऊन गेले. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन लोहारा तालुक्यात झालेल्या हा विवाह सोहळा.
झाले असे की, तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील प्रगतशील शेतकरी दत्ता सूर्यवंशी यांची कन्या रोहिणी व खेड येथील प्रगतशील शेतकरी कै. गोविंद पाटील यांचा मुलगा शुभम पाटील यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम गुरुवारी (दि. २८) धानुरी येथील शिवार गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दोन्हीकडील नातेवाईक आले होते. हा कार्यक्रम होत असताना मुलीकडील नातेवाईक धानुरी येथील उद्योजक भागवत बनकर व मुलाचे मामा खेड येथील प्रगतशील शेतकरी राजकुमार काकडे यांनी आपसात चर्चा करून याच कार्यक्रमात विवाह करण्याची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला उपस्थित नातेवाईकांनी होकार दर्शविला आणि याच कार्यक्रमात विवाह सोहळा झाला. अनावश्यक खर्चाला फाटा देत घेतलेल्या या निर्णयाचे परिसरात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा विवाह सोहळा होत असल्याची माहिती उपस्थित एका नातेवाईकाने लोहाऱ्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना दिली. ही माहिती मिळताच तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी कार्यक्रम स्थळी जाऊन नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले व त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले. या दोन्ही कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण करावे असे आवाहन तहसीलदार कुलकर्णी यांनी यावेळी केले. यावेळी ऍड. दिपक जवळगे, डॉ. श्रीनिवास जाधव, विठ्ठल रसाळ, उत्तम अमृतराव, प्रदीप कदम यांच्यासह वधूवरांचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.
————————-
अनावश्यक खर्चाला फाटा देत अशा प्रकारचे विवाह होणे ही काळाची गरज आहे. यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या निर्णयाचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
प्रसाद कुलकर्णी,
तहसीलदार, लोहारा