लोहारा तालुक्यातील माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिक्षणरत्न शिवाजीराव मोरे आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत लातूर (Latur ) येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकविला.
तालुक्यातील माकणी येथे बुधवारी (दि.३१) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन सत्रात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, संस्थेचे संस्थापक तात्यारावजी मोरे, श्रीधररावजी मोरे, शिवाजीराव मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. यावेळी भारत शिक्षण संंस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, संचालक त्र्यंबकराव इंगोले, रामराव इंगोले, दिगंबर बिराजदार, किशोर साठे, शुभम साठे, प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. व्ही. थोरे, उपप्राचार्य संजय अस्वले यांची प्रमुख उपस्थिती होती. दुसऱ्या सत्रात स्पर्धेचा निकाल घोषीत करुन लोहारा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावर्षी प्रथमच महाविद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यासह शेजारील लातूर व सोलापूर जिह्यातील १७ महाविद्यालयातील संघानी सहभाग नोंदवला. ‘जातीय व धार्मिक राजकारण भारतीय धर्मनिरपेक्षतेसाठी धोका आहे / नाही’ हा विषय ठेवण्यात आला होता. यात दमदार व सडेतोड मतमत्तांतर करत लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाने (सहभागी विद्यार्थी प्रमोद दत्तात्रय घोडके व प्रतिक्षा बळीराम मोरे) यांनी (रोख रक्कम १०००१/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) सांघिक प्रथम क्रमांक पटकवला. लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाने ( आदिती गजानन ढगे व प्रतिक्षा अंबादास चव्हाण) रोख रक्कम ७००१/- , स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) व्दितिय क्रमांक, तर मुरुम येथील कला, विज्ञान व वाणिज्य स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयाने (शुभांगी खुबा जाधव व शिफा इलाही पटेल) (रोख रक्कम ५०००/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र) सांघिक उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला. धाराशिव येथिल बिल गेट्स काॕलेजचा विद्यार्थी तेजस शिवदास वैष्णव याला उत्तेजनार्थ वैयक्तिक बक्षीस (३००१/ व प्रमाणपत्र) देण्यात आले. पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते विजयी महाविद्यालयाला रोख रक्कम, चषक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. या बरोबर सर्व सहभागी संघ व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा. राजेंद्र निगडे (श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी), डॉ. सुभाष हुलपल्ले (माधवराव पाटील महाविद्यालय, मुरुम), डॉ. सुभाष इंगळे, (श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा) यांनी काम पाहिले.
प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे यांनी प्रास्ताविकात संस्थेचा परिचय करुन दिला. उपप्राचार्य डॉ. डी.व्ही.थोरे यांनी स्पर्धेच्या विषयाचे विवेचन व स्पर्धेचे नियम व अटी सांगितले. प्रा डॉ. अतुल बिराजदार, प्रा.डॉ. एस.डी. कांबळे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा डॉ .किरण लोमटे यांनी आभार मानले. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेसाठी बाहेरुन स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.