शैक्षणिक वर्ष सन २०२५- २६ मध्ये इयत्ता सातवी वर्गाच्या झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून या विद्यालयाचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयात शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्यंकटराव गुंजोटे हे होते. या विद्यालयातील तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. यात आदिती गोविंद जाधव ही लोहारा तालुक्यात दुसरी तर यश परमानंद पांचाळ हा तालुक्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचबरोबर रोहन बालाजी पवार हा विद्यार्थी तालुक्यातून आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. हे तिन्ही विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. या विद्यार्थ्यांना दरवर्षी पुढील तीन वर्ष वार्षिक साडेसात हजार रुपये शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. वरील यशस्वी तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य व्यंकटराव गुंजोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपस्थित पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिंदे यांनी तर पर्यवेक्षक गणेश साठे यांनी आभार मानले.








