वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सध्या चालू असलेली वीज बिल वसुली तात्काळ थांबवून सदर वीजबिल रक्कम खरीप २०२० मध्ये नुकसान झालेल्या पिकांच्या मिळणाऱ्या पिक विमा रकमेतून भरणा करून घ्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन लोहारा तालुका भाजपाच्या वतीने महावितरण कंपनीचे उपअभियंता यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्याचे अर्थकारण पूर्णत: शेतीवर व पर्यायाने पावसावर अवलंबून आहे. २०२० मध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाच्या माध्यमातून नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलेली अनुदान हे खूप कमी होते. त्यानंतर पिक विमा मिळेल अशी अपेक्षा असताना हक्काच्या पीकविम्यापासून वंचित आहेत. सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याबाबत दि. ५ मार्च रोजी शासनाने पत्र काढले असले तरी प्रत्यक्षात अजून याबाबत कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे शेतकरी आणखीनच अडचणीत आहे. तसेच रब्बी हंगाम २०२० मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे मराठवाड्यातील विविध भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागला. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हरभरा, ज्वारी, गहु व इतर पिक कांदा, द्राक्ष, आंबा व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी काळी पडणे, हरभऱ्याला मोड येणे, तसेच द्राक्ष पिकाला अवकाळी पावसामुळे घड पडणे, मनी तडकने, बुरशी निर्माण होणे तसेच आंब्याचा तौर गळून नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महावितरण करून सरसकट वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्यांच्या उभ्या पिकांचे पाण्याअभावी प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. यात शेतात असलेल्या जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणकडून २४ तास वीजपुरवठा दिला जात नाही. लोडशेडींग ठेवली जाते. फक्त ८ तास वीजपुरवठा मिळतो आणि तो पण योग्य दाबाने मिळत नसल्यामुळे शेतीसाठी पाण्याचा पुरेसा वापर होत नाही. ट्रांसफार्मर जळाल्यानंतर एक एक महिना दुरुस्त करून दिली जात नाही. त्यात देखील ते दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनाच स्वखर्चाने ने आण करावी लागते. भविष्यातही नुकसानाची सामना करावा लागेल म्हणून विजेची नितांत गरज असल्याने अनेक शेतकरी व्याजाने पैसे काढून वीजबिल भरत आहेत. दिनांक ५ मार्च २०२० ला कृषिमंत्र्यांनी कंपनीला पिक विमा देण्यासाठी सूचना करू असे आश्वासन दिले आणि तसे पत्रक काढल्याचे समजते. परंतु याबाबत अद्याप काहीच झाल्याचे दिसून येत नाही.चेल हे पैसे जमा झाले तर शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी एक प्रकारे मदतच होणार आहे. त्यामुळे आमची शासनाकडे मागणी आहे की, आमच्या हक्काचा पीक विम्याच्या रकमेतून वीजबिल कपात करून घ्यावेत व विज पुरवठा तत्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं.स. सदस्य वामन डावरे, चिटणीस विक्रांत संगशेट्टी, बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, ओबीसी मोर्चा माजी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, कमलाकर शिरसाट, बालाजी सोनटक्के, प्रमोद पोतदार, बाळु माशाळकर, युवराज जाधव, गोविंद ढोणे, गणेश स्वामी, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.