समाजसेवा ही कोणत्याही धर्म, जात किंवा पंथापुरती मर्यादित नसून ती मानवतेच्या भावनेतून केली पाहिजे या विचारातून नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार व अमोल दत्तात्रय बिराजदार यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘मा. बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजने’ अंतर्गत रविवारी (दि.१४) मुस्लिम समाजातील खाजा मैनोद्दीन आरब ऊर्फ बिजू चाऊस यांच्या कन्या अनिसा व खाजा मैनोद्दीन शेख धाराशिव याचा मुलगा इरफान यांच्या विवाह सोहळ्यात नववधूस पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेहरावा आहेर प्रदान करण्यात आला.
हिंदू समाजातील लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असतानाही मयुरी बिराजदार व अमोल बिराजदार यांनी समाजकारणात सर्वधर्म समभावाची भूमिका कायम जपली आहे. समाजातील प्रत्येक कुटुंब हे आपलेच कुटुंब आहे, या भावनेतून त्यांनी विविध समाजघटकांच्या सुख-दुःखात सहभाग घेतला आहे. त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून मुस्लिम समाजातील या विवाह सोहळ्यात सहभागी होत नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यात आल्या. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या विचारसरणीला अनुसरून सुरू करण्यात आलेली ही योजना लोहारा शहरात सामाजिक सलोखा आणि एकोप्याचे प्रतीक बनत आहे. धर्म, जात, पंथ किंवा राजकीय विचार न पाहता गरजू व सर्वसामान्य कुटुंबांतील मुलींच्या विवाह प्रसंगी मदतीचा हात देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. या योजनेचा प्रारंभ रघुवीर घोडके – आशा घोडके यांची कन्या राधिका यांच्या विवाह सोहळ्यात खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर लोहारा येथील दत्ता निर्मळे व आशा निर्मळे यांची कन्या वैष्णवी निर्मळे, अंबाजोगाई येथे सोमनाथ निर्मळे व अलका निर्मळे यांची कन्या सीमा, तसेच लोहारा येथे मुस्लिम समाजातील रहेमान खुट्टेपड यांच्या कन्या शमिनबी , राजू स्वामी व सुवर्णा स्वामी यांची कन्या अश्विनी, पंढरपूर येथे दगडू जाधव व सुरेखा जाधव यांची कन्या शीतल यांच्या विवाहत देखील ‘बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजने’च्या माध्यमातून पाच ग्रॅम सोन्याची अंगठी भेट देण्यात आली होती. त्यामुळे ही योजना कोणत्याही एका समाजापुरती मर्यादित नसून सर्व समाजघटकांमध्ये समानतेची भावना रुजविणारी ठरत आहे.
आजच्या विवाह सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवदाम्पत्याला सोन्याची अंगठी व आहेर प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या अशा योजनांची समाजाला गरज असल्याचे मत व्यक्त केले. नगरसेविका मयुरी बिराजदार व अमोल बिराजदार हे विविध सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या सेवेत कार्यरत असून कन्या सन्मान योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या आनंदात सहभागी होत आहेत. समाजातील प्रत्येक कन्या ही आपल्या घरातील कन्येसमान आहे, या भावनेतून हा उपक्रम पुढेही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच शंकर जट्टे, माजी नगरसेवक आयुब शेख, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बाबा शेख, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी प.स.सदस्य सुधीर घोडके यासह आरब व शेख परिवारातील अनेक जण उपस्थित होते.








