महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत सिद्धेश्वर महिला प्रभाग संघाशी संलग्न असलेल्या ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघ, पोहनेर’ येथे आज वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी संपन्न झाली.
धाराशिव तालुक्यातील पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण, राष्ट्रगीत गायन, ‘वंदे मातरम्’ आणि तिरंगा प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. यानंतर गावात उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली. सभेच्या मुख्य सत्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

सभेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना तालुका व्यवस्थापक (IBCB) श्री. तेजस कुलकर्णी म्हणाले की, “उमेद अभियानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक साहाय्याचा योग्य वापर करून महिलांनी स्वतःचे नवीन व्यवसाय सुरू करावेत आणि चालू असलेल्या व्यवसायांची व्याप्ती वाढवावी.”
तालुका व्यवस्थापक (MIS) श्री. दत्तात्रय शेरखाने यांनी ‘उमेद’ अभियानाची संकल्पना सविस्तर मांडली. गावातील वंचित कुटुंबे व महिलांनी स्वयंसहाय्यता समूहात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच माननीय मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘लखपती दीदी’ मोहिमेची माहिती देऊन गावातील जास्तीत जास्त महिलांनी ‘लखपती दीदी’ व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रभाग समन्वयक श्रीमती शीतल गोरे यांनी गटबांधणी, मिळालेल्या कर्जाचा योग्य विनियोग, आर्थिक नोंदी व रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे आणि सर्व गट ऑनलाइन प्रणालीवर आणणे याविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रभाग संघ व्यवस्थापक श्रीमती अलका मोरे यांनी प्रास्ताविकातून गावातील एकूण बचत गट, मिळालेला निधी आणि नवीन गटांची माहिती दिली. तसेच सीआरपी (CRP) स्वाती मोरे यांनी मागील वर्षातील कामाचा आढावा सादर करून पुढील वर्षाचे वार्षिक नियोजन मांडले.
याप्रसंगी ग्रामसेविका शिंदे मॅडम यांनी ग्रामपंचायतीमार्फत मिळणाऱ्या विविध योजना व निधीवर माहिती दिली, तर बालविकास विभागाच्या सुपरवायझर मॅडम यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांवर मार्गदर्शन केले.

या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नेटके संयोजन ग्राम संघाच्या अध्यक्षा शशिकला धावारे आणि सचिव मोहिनी धावारे यांनी प्रभाग समन्वयक शितल गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने केले. या सभेला गावातील बचत गटांच्या सर्व महिला, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने ही सभा यशस्वीरीत्या पार पडली.








