वार्तादूत – डिजिटल न्यूज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदीपात्रात सोडलेल्या या पाण्यामुळे नदीपात्राच्या शेजारील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला चार दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु रविवारी रात्री झालेल्या पावसानंतर सोमवारी पहाटे ९ ते १० दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नदीपात्राच्या शेजारील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात राजेगाव, एकोंडी, रेबे चिंचोली, कवठा याठिकाणी सोयाबीन पाण्याखाली आहे. पाणी इतके होते की, नदीपात्राच्या दक्षिण बाजूस ५०० मीटर व उत्तर बाजूस ५०० मीटर अंतरापर्यंतच्या शेतात पाणी आले होते असे राजेगाव येथील शेतकरी अविनाश देशमुख यांनी सांगितले आहे. या ठिकाणी सोयाबीनच्या नुकसानीसह पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील माती वाहून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अविनाश देशमुख, अजित देशमुख, नागनाथ माने, आण्णा देशमुख, संजय देशमुख, राहुल देशमुख, समाधान मोरे, गोकुळ मोरे, विद्याधर मोरे, भवन देशमुख, प्रताप मोरे, अमोल देशमुख, अशोक देशमुख, नरेंद्र पाटील, नरेंद्र मोरे, शाहुराज देशमुख, विलास पाटील, बाजीराव पाटील, प्रदिप देशमुख, गोपाळ पाटील, प्रकाश देशमुख, रिंकू पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. मागील दोन तीन वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. यापुढील काळात माकणी धरणाच्या पाण्याने नुकसान झाले तर मी आत्मदहन करणार असा ईशारा राजेगाव येथील शेतकरी अविनाश देशमुख यांनी दिला आहे.